विक्रम गोखले: एसटीचा ‘ब्रँड अँबेसिडर' झाल्यावर झगमगाटापेक्षा कृतीला प्राधान्य अभिनेता
पुढारी ऑनलाईन: रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील ५० वर्षांपेक्षा अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज शनिवारी निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या १५ ते २० दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांचे वयाच्या 77 वर्षी निधन झाले. गोखले हे आपल्या दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे चर्चेत होते. राज्यात 2021 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी जेव्हा संप पुकारला होता तेव्हा त्यांनी त्यावर परखड भाष्य करत पाठिंबा दिला.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे 2003-2004 या कालावधीत एसटी महामंडळाचे ‘ब्रँड अँबेसिडर’ होते. त्यांनी ही जबाबदारी घेण्यापूर्वी ‘एसटी’चा सखोल अभ्यास केला. ‘अनुभव’ मासिकात त्यांनी याचं सविस्तर लेख लिहून विवेचन केलं. तसंच तयांनी अभ्यासाअंती एसटी महामंडळाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. या सूचना जर अंमलात आणल्या गेल्या असत्या तर आज फक्त एसटी तोट्यातून बाहेरच आली नसती, तर तिने मोठा नफा कमवला असता, असा त्यांचा दावा होता. मात्र तसं काही झालं नाही. सरकारी यंत्रणा आणि राजकारण्यांनी त्यांच्या या सूचनांना केराची टोपली टाकले.
अभिनेते असलेल्या विक्रम गोखले यांनी सदिच्छा दूत म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील अनेक एसटी आगारांना भेटी दिल्या. तिथे असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन समस्या सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला; परंतु त्यांना त्यामध्ये अपेक्षित प्रतिसाद यंत्रणेकडून मिळाला नाही. परिणामी हताश आणि नाराज होऊन त्यांनी या उपक्रमातून स्वत:हून माघार घेतली. फक्त प्रसिद्ध चेहरा असून चालत नाही. कारण तसं असतं तर अमितजी ‘ब्रँड अँबेसिडर’ असलेल्या गुजरात राज्यामध्ये पर्यटकांचा लोंढा वाढला असता, असं ते उदाहरण देऊन सांगत असत. जर एखादी योजना यशस्वी व्हायची असेल तर सरकारी स्तरावर निर्विवाद पाठबळ मिळायला हवं, असं त्यांचं ठाम मत होतं.