बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’वर आधारित ‘१७७०’चे मोशन पोस्टर लाँच | पुढारी

बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या 'आनंदमठ'वर आधारित '१७७०'चे मोशन पोस्टर लाँच

पुढारी ऑनलाईन : भारताचा गौरवशाली ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना निर्माते शैलेंद्र केकुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर आधारित ‘१७७० ‘चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार हे.

एस. एस. १ एन्टरटेनमेन्ट आणि पी. के. एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून, या बहुभाषिक असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विन गंगाराजू करणार आहेत. त्यांनी याआधी राजामौली यांना ‘एग्गा ‘ आणि ‘बाहुबली ‘ या दोन्ही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

अश्विन गंगाराजू चित्रपटाबद्दल सांगितले आहे की, ‘हा विषय माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता; पण दिग्गज व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी रूपांतरित कथा आणि पटकथा लिहिल्याने मला निश्चित यश मिळणार असे वाटते.  हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ज्या कथांमध्ये विशिष्ट कालखंड दाखवणारी पार्श्वभूमी असेल, भावनांना जिथे जास्त महत्त्‍व असते. या गोष्टीबद्दल सुरुवातीला मी थोडा साशंक होतो; पण जेव्हा मी राम कमल मुखर्जी यांच्याशी बोललो. त्यांचा या बद्दलचा दृष्टिकोन जाणून घेतला. तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर काही वेळातच निर्माते शैलेंद्र जी, सुजय कुट्टी सर, कृष्ण कुमार सर आणि सूरज शर्मा यांना मुंबईत भेटलो. आमची चित्रपटाबद्दल  प्रदीर्घ चर्चा झाली. एकत्र काम करण्याची त्यांची वृत्ती, त्यांच्या मनातील जिव्हाळा या गोष्टींमुळे मी त्यांच्याशी लगेचच जोडला गेलो.’ असे गंगाराजू यांनी सांगितले आहे.

यावर्षी ‘वंदे मातरम’ ला १५० वर्षे पूर्ण होत आहेत, हे गीत महर्षी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत प्रथम आले होते. या गीताने ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना हादरवून टाकले होते. पटकथा लिहिणारे प्रसिद्ध कथाकार व्ही. विजयेंद्र प्रसाद म्हणतात, ‘वन्दे मातरम्’ हा एक जादुई शब्द होता असे मला वाटते. महर्षी बंकिमचंद्र यांनी राष्ट्राला जुलूम आणि अन्यायाविरुद्द लढण्याकरिता दिलेला हा एक मंत्र होता.

दिवाळीपर्यंत या चित्रपटातील कलाकारांची घोषणा होणार असून,  अश्विनने त्याच्या टीमसह या कालखंडावर संशोधन सुरू केले आहे. एक अद्वितीय असा चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button