Sanjay Raut: हाच तुमचा विकास का ? संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे नागपूर शहराची धूळधाण झाल्यावर आता विरोधकांनी नागपूरच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात केली आहे. हाच काय नागपूरचा विकास, असा सवाल केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
संबंधित बातम्या
- कोविड कंत्राटी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना अटक
- नागपूर ; विघ्नहर्ता, सर्वांचे दु:ख दूर कर ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना
- लगे रहो! 'त्या' व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांचा विरोधकांवर पलटवारआमच्यावर मुंबईतील प्रश्नी टीका करता मग हाच काय तुमच्या नागपूरचा विकास ? असा सवाल त्यांनी (Sanjay Raut) फडणवीस यांना केला आहे. चार तासांच्या पावसात अख्खे नागपूर वाहून गेले, हाच तुम्ही केलेला विकास आहे का?, असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
खासदार राऊत म्हणाले की, नागपुरात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. लोकांची घरे, बंगले, झोपड्या पाण्यात गेल्या आहेत. फडणवीस हे स्वत:ला नागपुरचे सुपुत्र मानतात. नागपुरात पावसाचा धुडगूस सुरु असताना फडणवीस हे देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर श्री गणेश दर्शनात अडकले होते. त्यांच्यावर टीका झाली, तेव्हा ते नागपुरला गेले, असा दावाही राऊत यांनी केला. आम्हाला मुंबई सांभाळता येत नाही, अशी टीका सातत्याने भाजपकडून केली जाते. त्यानंतर आपण नागपूरमध्ये बदल घडवला आहे, अशी टीमकीही भाजपकडून वाजवली जाते. खरे तर आता सुधारणा हवी, टीकाटिप्पणी करण्यात काही अर्थ नाही. आपत्ती व्यवस्थापनात सरकार नागपूरमध्येच पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

