

खरे तर जिथे कुठे गर्दी होणार असेल तिथे कोणी जाऊच नये. काही ठिकाणी इतकी गर्दी जमते की, पोलिसांनाही त्याचे नियंत्रण आणि नियोजन करणे अशक्य होऊन बसते आणि चेंगराचेंगरीत अनेक लोक मृत पावतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
विजय थलपती नावाच्या तामिळनाडूच्या अभिनेत्याने एक सभा बोलवली. त्या सभेला इतकी गर्दी झाली की, चेंगराचेंगरीत चक्क 40 लोकांना जीव गमवावा लागला; तर पन्नासच्या आसपास लोक जखमी झाले. अरे काय चालले आहे हे... एक अभिनेता नेता बनलेला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी इतकी गर्दी, तेही आज मोबाईल, इंटरनेट, टीव्ही सर्व हाताशी असताना. दक्षिणेत नाही म्हटले तरी अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे आधीच अतिच लाड होत असतात.
तामिळनाडूमध्ये जयललिता, आंध्रप्रदेशमध्ये एन. टी. रामाराव तसेच करुणानिधी इत्यादी अभिनेत्यांनी आणि कलाकारांनी मुख्यमंत्रिपद मिळवले आणि ते अनेक वर्षे टिकवलेलेही दिसून येते. मंडळी, आठवून पाहा... जयललिता यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा तामिळनाडूमध्ये शंभर-एक लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. पडद्यावरील कलाकारांचे एवढे आकर्षण भारतात अन्यत्र कुठे नाही. रजनीकांत महोदय यांना पण राजकारणामध्ये येण्याची इच्छा झाली होती. पण प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी ती कुलूपबंद करून ठेवली. रजनीकांत हे सुपरस्टार राजकारणामध्ये आले असते तर याहीपेक्षा मोठी गर्दी त्यांच्या सभांना झाली असती.
तुम्ही म्हणाल की, लोक गर्दी करत असतील हे ठीक आहे. पण अभिनेत्यांनी अशा सभा नाही बोलावल्या तर काय बिघडणार आहे का? अगदी बिनतोड सवाल आहे सर्वांचा. गर्दी आपण जमवायची आणि त्याच्या नियोजनाची जबाबदारी सरकारवर टाकायची हे तत्काळ बंद केले पाहिजे. गर्दीचे नियोजन आणि जबाबदारी संबंधितावर टाकली तर खात्रीने असे वाटते की, या सभांना कात्री लागेल. गर्दी जमा करणे अभिनेत्याला सहजशक्य आहे. पण राजकारण्यांसाठी मात्र लोक स्वतःहून येत नाहीत हा आजचा अनुभव आहे.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लोक राजकारणाला कंटाळलेले आहेत. तामिळनाडूमध्ये असे काही नव्हते. विजय थलपतीची लोकप्रियताच इतकी आहे की, त्याला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लाखोंची झुंबड उडाली. अशा वेळी किमान सभा वेळेवर सुरू झाली असती तर एवढी गर्दी झाली नसती. सभा सुरू होण्याची आणि अभिनेत्याचे दर्शन घेण्याची वेळ लांबत असल्याने लोक अस्वस्थ होत गेले. उशिरा येणार्या लोकांची भरही त्यात पडली. गर्दी प्रमाणाबाहेर वाढल्यानंतर कुठेतरी काहीतरी प्रकार होत असतो आणि एकच गोंधळ उडत असतो. असाच काहीसा गोंधळ कुठेतरी घडला आणि तिथून पळापळी आणि चेंगराचेंगरीचा भयानक प्रसंग निर्माण झाला, तो टाळता आला असता.