

महायुतीला ५३ ते ५५ टक्के मतदारांचा पाठिंबा
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीबद्दल ५३ टक्के लोक समाधानी
भाजपा अजूनही महायुतीला बळ देणारा पक्ष
Pudhari VMR Maharashtra Survey 2025 Bjp Devendra Fadnavis
जय मृग, संचालक, व्होटर्स मूड रिसर्च (व्हीएमआर)
पुढारी माध्यम समूह आणि व्हीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून महाराष्ट्रात राजकीय ध्रुवीकरण झाले असून राज्यातला मतदार महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन गटांत पूर्णपणे विभागला गेला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. मतांच्या टक्केवारीकडे नजर टाकल्यास महायुतीला ५३ ते ५५ टक्के मतदारांचा; तर महाविकास आघाडीला ४२ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे, असे चित्र पाहायला मिळते आहे.
तुम्ही राज्य सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीबद्दल समाधानी आहात का, असे विचारल्यानंतर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्रातले राजकीय धुव्रीकरण दाखवणारा होता. ५३ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले, तर ४१ टक्के नागरिक असमाधानी होते. राज्य सरकारच्या कामगिरीस १ ते १० या श्रेणीत गुण देण्यास सांगितले असता ६२ टक्के लोकांनी ५ किंवा त्याहून अधिक गुण दिल्याचे दिसून आले.
भाजप महायुतीचा महानायक
राज्यात भारतीय जनता पक्षाची स्थिरावलेली मतांची टक्केवारी हा नवा उच्चांक ठरला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला २६% टक्के मते मिळाली होती. सर्वेक्षणात हा मतदारांचा आकडा आता ३५% इतका आहे. याचा अर्थ असा की भाजपा अजूनही महायुतीला बळ देणारा पक्ष आहे. अन्य कोणताही पक्ष या टक्केवारीच्या आसपासही नसल्याने भाजपाबरोबर युती करण्यासाठी अन्य पक्षही कायम तयार असणार, हे निश्चित आहे.
काँग्रेसला शोध नेतृत्वाचा, आश्वासक चेहर्याचा
सर्वेक्षणातून प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांचे प्रमाण बघितले, तर काँग्रेसला स्वतंत्रपणे सुमारे २० % मतदारांनी पसंती दिली आहे. शिवसेना शिंदे गटाला १३.१६% मतदारांनी तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ११.६ % मतदारांनी पसंती दिली आहे.
शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही गटांच्या मतांचे प्रमाण हे समान प्रमाणात विभागलेले दिसते. मात्र वर्ष २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याशिवाय काँग्रेसकडे राज्य पातळीवर ओळख असलेला दुसरा चेहरा नाही. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना पर्याय म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या चेहर्यासाठी एकनाथ शिंदे यांना पसंती देण्याकडे मतदारांचा कल सर्वेक्षणातून दिसतो.
(जय मृग हे भारतातील प्रख्यात निवडणूक विशेषज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्थापन केलेली व्होटर्स मूड रिसर्च (व्हीएमआर) ही संस्था राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील जनमताचा अभ्यास करण्यासाठी कार्यरत आहे.)