Symbol Of Peace | शांतिदूत...
सध्या राज्यामध्ये कबुतरांची खूप चर्चा सुरू आहे. कबुतरे ही खरे तर शांततेचे प्रतीक समजली जातात. दोन देशांमध्ये काही करार झाला, तर पूर्वी कबुतरांना अवकाशात मुक्त केले जायचे. आता हीच कबुतरे अशांततेचे प्रतीक झाली आहेत.
तुमच्या घराच्या बाहेरील खिडकीवर कबुतराची जोडी बसली असेल, तर तुम्ही इच्छा नसताना त्यांच्या संसाराचे साक्षीदार होता. तुमच्या संसाराची वाट लागली असली, तरी कबुतरांचा संसार मात्र एकमेकांची साथ घेत सुरू असतो. दिवसभर ‘गुटरगूऽऽ’ करीत कबुतरे आनंदी असतात. सध्या मुंबईच्या कबुतरखान्याचा विषय चर्चेत आहे. तसे पाहिले, तर कुठलाही पक्षी माणसाला येऊन ‘मला दाणे द्या, खायला द्या’ असे म्हणत नाहीत. भल्या पहाटे पाच वाजता उठून तो आपले खाद्य स्वतः शोधतो आणि संध्याकाळी पुन्हा परत येतो. काडी काडी जमा करत घरटे करणे, अंडी देणे, पिलांचे संगोपन करणे ही सगळी कामे सगळेच पक्षी करत असतात.
कधी ऐकलं आहे का की कोणाचं आयुष्य एका पक्ष्यामुळे पोखरलं गेलंय? हो हो, तेच आपल्या गल्लीतल्या छतांवर झोप घेत असलेल्या ‘गुटरगूऽऽ गुटरगूऽऽ’ करणार्या कबुतरांमुळे. कबुतरं ही शांततेचे प्रतीक फक्त चित्रपटात असतात. प्रत्यक्षात ही कबुतरं एकदम ‘लोकल गुंड’ असतात. सकाळी झोपेमध्ये असतानाच त्यांच्या ‘गुटरगूऽऽ’ने असा त्रास होतो की, एखादा माणूस चिडून ‘अलार्म’पेक्षा कबुतरच विकत घेईल, रोज वेळेवर जागे होण्यासाठी. त्यांची विष्ठा हा पायर्यांवरचा बर्फ नव्हे, तर कबुतरांचं ‘गिफ्ट’ असतं.
बर्याच लोकांचं सकाळचं पहिलं काम असतं ते म्हणजे, अंगण झाडून कबुतरांचं ‘पार्सल’ उचलणं. एवढंच नव्हे तर ते डोक्यावर, कपड्यांवर, गाड्यांवर अगदी आदराने ‘ड्रॉप’ करून जातात. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःचीच जागा बुक करतात. एकदा एखाद्या खिडकीवर बसले की, मग तीच जागा ‘कबुतरांच्या बुकिंग सिस्टीम’मध्ये कायमची होत जाते. मग, ते ‘प्रेमळ’ जोडपं तिथे घरटं बांधायला सुरुवात करतं. म्हणजे आपण दररोज त्यांच्या संसाराचा साक्षीदार होतो, तेही अनिच्छेने. अनेकदा धुणं वाळत घातल्यानंतर एकदम धबधब्यासारखं पाणी नाही, तर कबुतरांच्या विष्ठेचा ‘शॉवर’ अंगावर पडतो.
खिडक्यांना नेट लावून कबुतरांना ‘गेट आउट’ची सूचना देता येते. घरात त्यांना अन्न न देता, त्यांचं ‘रेस्टॉरंट बंद’ करावं. कबुतरं हसवतात, रडवतात; पण वागायलाही शिकवतात. थोडं हसत, थोडं सावध राहत आणि थोडं जागरूक होऊन आपण या ‘गुटरगूऽऽ’ संकटावर मात करू शकतो. सध्या कोणताही विषयावर खूप चर्चा केली जाते. कोणाची एक बाजू असते, तर कोणाची दुसरी बाजू असते; पण यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद न घालता चर्चा करून तो विषय मार्गी लावणे, हे श्रेयस्कर असते.

