

काही लोकांना स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी विनाकारण तोंडाची वाफ दवडण्याची सवय असते. मला एक सांग मित्रा, पाकिस्तानचा सैन्यप्रमुख असीम मुनीर नेहमीच का बडबडत असतो?
हे बघ भावा, पाकिस्तान हे नामधारी लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही तिथे नावालाच आहे. सगळा कारभार सैन्यच करत असते. एखादा सेनापती असा येतो की, तो जगाला दाखवायचा प्रयत्न करतो की, या सर्वांचा प्रभारी मीच आहे. त्यात असीम मुनीरसारखे गृहस्थ वाटेल ते बडबडणारे आहेत. आपल्या देशाची काय परिस्थिती आहे, हे त्याला माहीत नाही अशातला भाग नाही. तरी तो अशी बडबड करत असतो. आजघडीला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आटा चारशे रुपये किलो आणि पेट्रोल तीनशे रुपये लिटरने मिळत आहे. अशा देशाने युद्धाच्या बाता करण्यात काही अर्थ नाही. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे म्हणून उठसूट भारताला धमकी देण्यात काही अर्थ नाही. ज्या देशाचे मिसाईल खेळण्यातल्या मिसाईलसारखे नको तिथे जाऊन पडले, त्या देशाने भारतासारख्या बलाढ्य देशाचा मुकाबला करावा, ही अशक्य गोष्ट आहे. आम्ही काहीही करू शकतो, अशी पोकळ बढाई मारण्याचा पराक्रम फक्त पाकिस्तानच करू शकतो.
मला एक कळत नाही की, गर्तेत असलेल्या अशा देशाला चीन तरी का मदत करत आहे? चीनला बाजारपेठ सगळ्या जगाची उपलब्ध आहे; पण पाकिस्तान असे काय विशेष त्यांना देत आहे.
पाकिस्तानकडे चीनला देण्यासारखे काहीच नाही; परंतु आशिया खंडामध्ये आपले वर्चस्व कायम राहावे म्हणून चीन पाकिस्तानला आपल्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याने पाकिस्तानला कर्जे दिली आहेत आणि त्यासाठी पाकिस्तानला टिकवून ठेवणे चीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. पाकिस्तानची शस्त्रास्त्रे आणि संरक्षण प्रणालीसुद्धा मेड इन चायना असल्यामुळे त्यांचा उपयोग शून्य आहे, हे नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात दिसून आले आहे. अथक संशोधन करून भारताने विकसित केलेली मिसाईल्स अचुकरीत्या लक्ष्यभेद करू शकली आहेत. फार मन लावून युद्ध केले तर मला वाटते, भारत तीन दिवसांत पाकिस्तानचा संपूर्ण नायनाट करू शकतो.
कुणाही राष्ट्राचा नायनाट करणे जगाला नव्हे, तर आपल्यालाही परवडणारे नसते. तिथे विध्वंस झाला, तर तेथील निर्वासित लोकांचे लोंढेच्या लोंढे भारतामध्ये येतील आणि त्यांना आपण कसे पोसणार, हा आपल्यापुढे मोठाच प्रश्न उभा राहील. त्यापेक्षा त्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकणे जास्त उपयुक्त असते. ज्याची आर्थिक ताकद चांगली आहे, तोच देश लढाई करू शकतो किंवा युद्धाला सामोरे जाऊ शकतो. कमकुवत देश कधीही आक्रमण करत नसतात आणि त्यांची स्वतःची संरक्षण करण्याची सिद्धता ही क्षीण असते.