

जागतिक तापमानवाढीमुळे होणार्या हवामान बदलांमुळे मान्सूनवर मोठा परिणाम होत असून, कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बंगळूर, चेन्नई, मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये यामुळे हाहाकार उडाला. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांवर महापुराची टांगती तलवार यंदाही कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात हे प्रकार का घडताहेत? त्यावर उपाय काय असू शकतात?
साधारण दोन दशकांपूर्वी जेव्हा जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ ग्लोबल वॉर्मिंग या विषयाबाबत पोटतिडकीने जगाला सावध करत होते, तेव्हा त्याकडे फारसे कुणी गांभीर्याने पाहिले नाही. उलट विकासाचे शत्रू म्हणून त्यांना हिणवण्यात आले; पण जसजशी वर्षे सरली, तसतसे या इशार्यातील मर्म जगाला कळू लागले. जागतिक तापमानवाढ हाताबाहेर गेल्यामुळे हवामानात झपाट्याने बदल होत असून, सृष्टीवरील ऋतुचक्र बदलत चालल्याचे, नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत चालल्याचे आता अखिल मानवजातीला उमगले आहे. याचे कारण हवामान बदलांचे द़ृश्य परिणाम आता उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. युरोप, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन, बांगला देश, श्रीलंका, मालदीव यांबरोबरीने भारतही आता जागतिक तापमानवाढीच्या झळांनी ग्रस्त होत चालला आहे. पूर्वी 100 दिवसांत पडणारा पाऊस आता 50 दिवसांत पडत आहे. कमी काळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नद्यांना अचानक येणारे पूर, जलमय होणारे परिसर, पाणी साचून कोलमडून पडणारी शहरे, नागरिकांचे स्थलांतर, पुराच्या पाण्याच्या वेढ्यामुळे होणारी प्रचंड मोठी वित्तहानी, जीवितहानी या सर्व प्रकारांनी पावसाळा हा आल्हाददायक ठरणारा ऋतू गाजत चालला आहे.
22 जुलैपासून जोर धरलेल्या पावसाने असा काही तडाखा दिला की, पुणे व मुंबई या दोन महानगरांमधील तलाव, धरणे काठोकाठ भरण्यासमीप येऊन पोहोचली, तर काही धरणे ओव्हरफ्लो झाली. सर्वसामान्यांच्या द़ृष्टीने पुढील आठ-दहा महिन्यांची पाण्याची चिंता यामुळे मिटल्यामुळे हा पाऊस आनंददायी ठरला असेल, यात शंका नाही; परंतु एकाएकी प्रचंड प्रमाणात पडलेल्या या पावसामुळे नागरी जीवन कोलमडून पडले. विशेषतः पुण्याच्या घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाने तुफान बॅटिंग केली. परिणामी, पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण तुडुंब भरले आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत हे धरण भरते आणि पाण्याचा विसर्गही होतो. साधारणतः 10 ते 30 हजार क्युसेकपर्यंत टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढत जातो, हा दरवेळचा अनुभव; परंतु यावेळी पाऊसच इतका प्रचंड झाला की, एका रात्रीत खडकवासला धरणातून 30 ते 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग एकाएकी सुरू झाला. यामुळे पुण्यातील मुठा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आणि सिंहगड रोड परिसरातील काही भागांतील नागरी वस्त्यांमध्ये शिरले.
दरवर्षी पावसाळ्यात घडणार्या या घटनांनंतर त्यांची मीमांसा करताना धरणातील पाणीपातळी व्यवस्थापनाचा मुद्दा चर्चेत येतो. यंदा पुण्यातही खडकवासलातून होणार्या विसर्गावरून वाद सुरू आहेत. वस्तुतः कोणत्याही धरणाची उभारणी ही शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणार्या पावसामुळे धरणामध्ये किती पाणी पातळी वाढू शकते, ते किती पातळीपर्यंत साठवून ठेवायचे, धरणातून विसर्ग करण्यासाठीची यंत्रणा, या सर्व गोष्टी सूत्रबद्ध पद्धतीने आणि शास्त्राच्या आधारावर सुरू असतात; पण मुख्य प्रश्न निर्माण होतो तो धरणातून विसर्ग करण्यात आलेले पाणी पुढे प्रवाहित होत असताना येणार्या अडथळ्यांमुळे. आज पुणे असो किंवा कोल्हापूर, सांगलीचा भाग असो किंवा मुंबईतील मिठी नदी असो, या नद्यांच्या प्रवाहामध्ये किती मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत, याची मोजदाद करता येणार नाही.
प्रत्यक्षात मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर किंवा अन्य महानगरांमध्ये, शहरांमध्ये अशा प्रकारच्या जल आपत्तींमध्ये होणार्या वित्तहानीस निसर्गाचे दोहन करून उभी राहिलेली बेकायदा किंवा अनधिकृत बांधकामे कारणीभूत आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पूर नियंत्रणासाठीची यंत्रणा, कायदे, नियम सर्व असूनही प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संकटे गंभीर होत चालली आहेत. याबाबत चर्चा-विचारविनिमय, समित्यांची नेमणूक हा सर्व आता औपचारिकतेचा भाग बनला असून, तो केवळ दिखाऊपणा ठरत आहे. समित्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणीच होणार नसेल, तर संकटांची पुनरावृत्ती घडणे अटळ आहे.
एकंदरीत, या सर्व प्रकारांकडे पाहताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे नदीपात्रांसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून अनधिकृत, अतिक्रमित बांधकामे- मग ती कोणाचीही असोत, तातडीने हटवली गेली पाहिजेत आणि नद्यांचे मार्ग मोकळे झाले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची आणि व्यापक गोष्ट म्हणजे, आजच्या वातावरणीय बदलांना निसर्गाचा र्हास हे मुख्य कारण आहे. अशा स्थितीत निसर्गावर कुर्हाड चालवून आपण शहरांचा विकास करण्याचा, विकासाच्या नावावर मोठमोठे प्रकल्प आणून वनसंपदेचा नाश करण्याचा, वृक्षराजी तोडून रस्तेनिर्मिती करण्याचा मार्ग कधीपर्यंत अनुसरणार आहोत? यातून आपली वाटचाल विकासाकडे होत नसून विनाशाकडे होत आहे. येणार्या काळात ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा अधिक तीव्र होत जाणार आहेत. आज दिसणारा ट्रेलरच जर इतका भयावह असेल, तर उद्याच्या भविष्यातील संकट किती मोठे असू शकते, याची कल्पना करून मानवाने भानावर येणे गरजेचे आहे. अन्यथा...