राजापूर : फासकीत अडकून बिबट्याचा मृत्‍यू; गुरख्यांकडून परस्‍पर विल्‍हेवाट

बिबट्याचा मृत्‍यू
बिबट्याचा मृत्‍यू
Published on
Updated on

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खरवते गावात आंबा बागेत लावलेल्या फासकीत अडकून बिबट्या मृत्युमुखी पडला होता. या बिबटयाची बागेत काम करणाऱ्या दोन गुरख्यांनी खड्डयात पुरून परस्पर विल्हेवाट लावली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या प्रकाराची चौकशी सुरू केली. या प्रकरणी दोन गुरख्यांना ताब्यात घेतले आहे. खरवते हेदाडवाडी येथे हा प्रकार घडला असून, सुमारे 15 दिवसांपुर्वी या बिबटयाचा मृत्यू झालेला असावा अशी माहिती रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली आहे.

ज्या खड्डयात या बिबटयाला पुरण्यात आले होते तो खड्डा पुन्हा खोदून मृत बिबटयाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 15 दिवस उलटून गेल्याने तो पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

अशा प्रकारे बागांमध्ये फासक्या लावून वन्य प्राण्यांचे जीव घेण्याचे प्रकार अत्यंत निंदनिय असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया तालुक्यात उमटत असून, यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, मौजे खरवते ता. राजापूर येथे बिबट्याचा मृतदेह जमिनीत पुरला असल्‍याची गोपनीय माहिती राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांना समजली. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली असता, सदरची घटना ही नितीन व सुनील पद्माकर कुलकर्णी रा. खरवते येथील त्यांच्या मालकी गट नंबर १६/२ मध्ये घडली. साधारण पंधरा दिवसांपूर्वी फासकिमध्ये अडकुन बिबट्या मृत झाला होता. या ठिकाणी शेतामध्ये राखण करणारे कामगार राजेश चौधरी व जगतराम चौधरी यांनी यानंतर या मृत बिबट्यास खड्डा काढून पुरले व त्याची परस्पर विल्हेवाट लावली.

सदरची घटना साधारण पंधरा दिवसांपूर्वी घडलेली असून हा प्रकार रविवारी निर्देशनास आला आहे. याबाबत वनविभागाच्या वतीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली आहे. सदरची घटना सत्य असून, ज्या ठिकाणी खड्डा काढून् मृत बिबटयाला पुरले होते त्या बिबट्याला बाहेर काढून अवशेष ताब्यात घेतले आहेत. पशुसंवर्धन अधिकारी लांजा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मृत बिबट्याची तपासणी करून घेतली असल्याचे वनविभागाच्या वतीने नमुद करण्यात आले आहे.

नितीन व सुनिल पद्माकर कुलकर्णी यांनी त्यांची आंबा बाग ही मौजे खरवते गावातील तुषार व तुळशीदास तात्या सोरप यांना करार तत्वावर दिली आहे. सोरप यांनी आंबा बाग राखणीकरता १) राजेश पुरण चौधरी व २) जगतराम चौधरी, हे मजूर रा. तिकापूर जि.कैलाली (नेपाळ ) येथून आणलेले आहेत. या प्रकरणी या दोन्ही गुरख्यांविरोधात वन्य जीव संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विभागीय वनाधिकारी दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल राजापूर सदानंद घाडगे, वनरक्षक सुरज तेली खरवते पोलिस पाटील सचिन सिताराम मांडवकर यांनी केली. सदर ठिकाणी ग्रामस्थ हरीचंद्र जैतापकर हे उपस्थित होते. पुढील तपास वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार करत आहेत. अशा प्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news