Rain Alert : ‘या’ भागात दोन दिवस हलका पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मळभी वातावरण कोकण किनारी भागात तयार झाले असून, आगामी दोन दिवस किनारपट्टी भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Rain Alert)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी 24 तासांनंतरच वातावरणीय बदलाची शक्यता असून, या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सलग चौथ्या महिन्यातही अवकाळी पावसाचे सावट असल्याचे नमूद केले आहे.
भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस म्हणजे 5 आणि 6 फेब्रुवारीला हवामानासंदर्भात उत्तर-पश्चिम भारत आणि पूर्व-ईशान्य भागात बदललेल्या हवामानाच्या स्थितीनुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
Rain Alert : हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार
येत्या 5 आणि 6 फेब्रुवारीला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी काहीशी कमी झालेली थंडी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर त्याच बरोबर नव्या वर्षात जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता फेब्रुवारी महिन्यातही पावसाचे मळभी ढग पुन्हा दाटण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळी मळभी वातावरणासह आर्द्रतेच्या प्रमाणातही वाढ झाली होती, तर तापमानात किंचित वाढ होऊन थंडीचे प्रमाणही घटले होते.
शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान 24, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये दोन ते 3 अंशाने वाढ झाली.

