

पिंपरी: अवघ्या अकरा महिन्यांचा मुलगा नुकताच रांगू लागला होता. बोबड्या शब्दांत 'पप्पा' अशी हाक मारण्यास त्याने सुरुवात केली होती. वडिलांच्या कुशीत खेळण्याचे दिवस नुकतेच सुरू झाले होते; पण नियतीने एका क्षणात सर्व काही हिरावून घेतले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक'च्या बोगद्यात झालेल्या भीषण अपघातात वाकड येथील तुषार वामन भूमकर या उमद्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला अन् तृशांक (वय ४) आणि आर्यवीर (११ महिने) या दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र कायमचे हरपले.
तुषारचे ५ मे २०१८ रोजी अंकिताशी लग्न झाले होते. त्यांच्या संसारवेलीवर तृशांक आणि आर्यवीर ही दोन फुले उमलली. त्यातील धाकटा आर्यवीर अवघा अकरा महिन्यांचा असून, तो नुकताच रांगू लागला होता. बोबड्या शब्दांत 'पप्पा' म्हणत वडिलांकडे झेपावणाऱ्या त्या चिमुकल्याला आता आयुष्यभर वडिलांचे प्रेम केवळ आठवणीतच राहणार आहे. या घटनेने अंकिता आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तुषारच्या आयुष्यात दुर्दैवाचा हा पहिलाच आघात नव्हता. तो अवघा सात वर्षांचा असताना त्याचे वडील विहिरीत पडून मृत्युमुखी पडले होते. लहानवयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई मालती यांनी मोठ्या कष्टाने कुटुंब सावरले. पुढे तुषारनेही घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. कुटुंबाला आधार देत त्याने अथक परिश्रमातून स्वतःचा व्यवसाय उभा केला. हॉटेल आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मेहनतीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. आई मालती, पत्नी अंकिता आणि मुलांसाठी तोच घराचा आधारवड होता. मात्र, नियतीने हा आधारही हिरावून घेतल्याने भूमकर कुटुंब पुन्हा एकदा दुःखाच्या गर्तेत लोटले गेले आहे.
स्वभावाने अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि मदतीला तत्पर असलेल्या तुषारने मोठा मित्र परिवार कमावला होता. कोणत्याही मित्राच्या अडचणीला धावून जाणारा, सर्वांना आपलेसे करणारा असा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी समजताच वाकडसह पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मागील महापालिका निवडणुकीत त्याची पत्नी अंकिताने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. राजकीय समीकरणे जुळून न आल्याने तिला पराभव स्वीकारावा लागला. त्या संपूर्ण काळात तुषार पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. या निवडणुकीच्या माध्यमातून कुटुंब आणि मित्रांसोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
अंत्यदर्शनासाठी दीड किलोमीटरची रांग
शुक्रवारी सकाळी तुषारच्या अंत्यदर्शनासाठी नागरिक, नातेवाईक, मित्र परिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्ययात्रेदरम्यान वाहनांच्या तब्बल दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक कोंडी झाली. तुषारला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेकांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी हजेरी लावली.
सोशल मीडियावरही हळहळ
सोशल मीडियावरही दिवसभर तुषार भूमकरचे छायाचित्र अनेकांच्या स्टेटसवर झळकत होते. भावपूर्ण श्रद्धांजली, खूप लवकर निघून गेलास मित्रा, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, काहींनी मिसिंग लिंकच्या बोगद्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली.