

cyber attack by pakistan
पिंपरी : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यामध्ये दहशतवादी गटांची मोठी हानी झाली. पाकिस्तानकडून या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारतीय सीमांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांचे सत्र सुरू करण्यात आले; मात्र भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हे हल्ले निष्फळ ठरले. रणभूमीवर अपयश येत असल्यामुळे पाकिस्तानकडून आता सायबर हल्ला केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंक किंवा फाईल्सवर क्लिक न करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या सायबर हल्ल्याचा उद्देश केवळ माहिती चोरी करणे नसून, देशातील सामान्य नागरिकांची खासगी माहिती मिळवून त्याचा दुरुपयोग करणे हा आहे. या व्हायरसमुळे बँक खात्यांचे तपशील, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड माहिती चोरली जाऊ शकते. मोबाईल, संगणकावरील सर्व फाईल्स, फोटो, डॉक्युमेंट्सचा वापर गैरप्रकार करण्यासाठी केला जाऊ शकतो. मोबाईल संक्रमित झाल्यानंतर कॅमेरा किंवा माइकचा वापर करून हेरगिरीदेखील केली जाऊ शकते.
सायबर हल्ल्यांच्या वाढत्या संशयामुळे महाराष्ट्र पोलिसांनी स्थानिक पातळीवरही सतर्कता वाढवली आहे. पिंपरी-चिंचवडसह अन्य ठिकाणचे सायबर सेल सक्रिय करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. सोशल मीडियावर जनहित संदेश, बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, आणि संशयास्पद अॅप्स ओळखण्याच्या सूचना नियमितपणे प्रसिद्ध केल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालये आणि वसतीगृहांमध्येदेखील सायबर सुरक्षा मार्गदर्शन सत्रांचे आयोजन सुरू आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यावर पोलिसांचा भर आहे.
पाकिस्तानने आता सायबर युद्ध छेडले असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवरून, विशेषतः Whats App, Facebook, Telegram आणि ईमेलद्वारे, एक घातक मालवेअर पसरवण्यात येत आहे. या मालवेअरचे नाव" Dance of the Hillary'' असून, ते "" tasksche. exe'', " DanceofHillary. exe'', “ OperationSindoor. ppt'”, “ " OperationSindhu. pptx'' ” अशा नावाच्या फाईल्समधून पाठवले जात आहे. या फाईल्स पाहताना त्या सामान्य वाटतात. मात्र, क्लिक करताच डिव्हाईसमध्ये एक हानी पोचविणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होते. एकदा डिव्हाईस संक्रमित झाला की त्या युझरचा फोन किंवा संगणक पूर्णपणे हॅकर्सच्या नियंत्रणात जातो.
भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (CERT- In) आणि गृहमंत्रालयाच्या सायबर विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अद्याप पाकिस्तानचा थेट उल्लेख अधिकृतरित्या केला गेलेला नसला, तरी हल्ल्याच्या पद्धती व वेळ पाहता, यामागे पाकिस्तानमधील सरकारी पाठबळ असलेल्या सायबर गटांचा हात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.