

Special Search campaign : पिंपरी : हरविलेले बालक आणि महिला यांचा शोध घेण्यासाठी राज्यभरात ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 17 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली ही मोहीम 15 मे 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे अपर पोलिस महासंचालक यांच्या निर्देशानुसार सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेचा मुख्य उद्देश हरवलेल्या 18 वर्षांखालील बालक आणि 18 वर्षांवरील महिलांचा शोध घेणे, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवणे, तसेच बेकायदा कामांमध्ये अडकलेल्या अल्पवयीन बालकांची सुटका करणे, हा आहे
या मोहिमेसाठी प्रत्येक पोलिस उप विभागात तीन पथके तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक/हवालदार आणि एक पोलिस कर्मचारी (त्यापैकी एक महिला कर्मचारी असणे बंधनकारक) असेल. या पथकावर एका पोलिस उपनिरीक्षकाची देखरेख राहील. मोहिमेदरम्यान या अधिकार्यांना इतर कोणतेही कार्य सोपवले जाणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी या पथकाला ठरावीक लक्ष्य दिले जाणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी किंवा सहायक पोलिस आयुक्त त्यांच्या कामाचा दररोज आढावा घेणार आहेत. दर आठवड्याला अपर पोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपायुक्त तसेच पंधरवड्याला पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
‘ऑपरेशन शोध’बाबत सर्व पोलिस स्टेशनने स्थानिकांना याबाबत माहिती द्यावी, तसेच बालकांसाठी काम करणार्या स्थानिक अशासकीय संस्थांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मदतीने मोहिमेची माहिती समाजात पोहचवावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. बाल कल्याण समित्या, जिल्हा बालसुरक्षा कक्ष, बाल निरीक्षणगृह, महिला सुरक्षागृह आदी संस्थांशी समन्वय साधून माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.
ऑपरेशन शोध मोहिमेंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याने हरविलेल्या बालकांसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मोहिमे दरम्यान प्रमुख रेल्वे स्थानके, बस स्थानके, मेट्रो स्टेशन, पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळे याठिकाणी फिरणार्या अल्पवयीन मुलांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच भीक मागणारे, वीटभट्टीवर काम करणारे, हॉटेल्समध्ये काम करणारी बालके यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.
राज्यातील काही भागांमध्ये विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात अनेक बालकांना वीटभट्टी, हॉटेल्स, ढाबे अशा ठिकाणी बेकायदा कामावर ठेवले जाते. या मुलांवर लहान वयात कामाचा अनावश्यक ताण येतो, त्यांचे बालपण हिरावले जाते, शिक्षणाचा हक्क नाकारला जातो. तसेच, त्यांचे शोषण होण्याचा धोका असतो. ‘ऑपरेशन शोध’मोहिमेमुळे या मुलांची ओळख पटवून त्यांची सुटका करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.