

सांगवी: उत्सव आनंदाचा, पण नियमांची पायमल्ली करणाऱ्र्यांची खैर नाही, असा सांगवीत प्रशासनाने गणेश मंडळांना सज्जड दम दिला आहे. डीजे, डॉल्बी अन् लेझरवर खाकीची नजर राहणार आहे. यामुळे गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करा, पण नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
उत्सवाचा जल्लोष करताना सुरक्षिततेची कोणतीही चौकट ओलांडली गेल्यास ती पोलिसांना अजिबात चालणार नाही, असा सज्जड इशारा देत पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांनी यंदा ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची मर्यादा आणि डॉल्बीच्या वापरावर थेट शंभर टक्के गुन्हे दाखल करून साहित्य जागेवरच जप्त करण्यात येईल. विशेषतः लहान मुले व नागरिकांच्या डोळ्यांना कायमस्वरूपी व गंभीर धोका निर्माण करणाऱ्या लेझर दिव्यांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून, आगामी गणेशोत्सव पूर्णपणे शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात पार पाडण्यासाठी सांगवी पोलिस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका स्वीकारली आहे. रामकृष्ण मंगल कार्यालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त मनीषा कदम, सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, वाहतूक निरीक्षक चंद्रकांत वाबळे, पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर, 'ह' प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, 'ड' प्रभागाचे प्रशासकीय अधिकारी राजू कांबळे आणि माजी स्वीय नगरसेवक महेश जगताप यांच्यासह सांगवी परिसरातील शेकडो गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात उपस्थितांकडून अमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन करण्यात आली.
ध्वनिप्रदूषणाची स्वतंत्र तपासणी
शिवाजीनगर कार्यालयामार्फत ध्वनिप्रदूषणाची स्वतंत्र तपासणी केली जाईल. मागील वर्षी सांगवीत डीजेच्या अतिरेकामुळे निर्माण झालेल्या वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या पाहता यंदा विसर्जन मिरवणूक साडेचार वाजताच अचूक वेळेत सुरू करावी लागेल आणि त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
पारंपरिक वाद्यांवर भर द्या
या बैठकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी पारंपरिक वाद्यांना भरघोस प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडत, विसर्जनाच्या पारंपरिक मार्गात किंवा क्रमवारीत कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. पोलिस कोणालाही जाणीवपूर्वक त्रास देत नाहीत; परंतु नियमांचे पालन, डीजेची ध्वनिमर्यादा, महिलांची सुरक्षा, मद्यपींवर कडक कारवाई आणि एफडीआय नियमावलीनुसार होणारा महाप्रसाद वाटपाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्या..
वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत वाबळे म्हणाले, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून मंडपासाठी रस्त्याचा केवळ एक तृतीयांश भागच वापरला जावा. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांवर आणि वाहनचालकांकडे वैध परवाना असणे बंधनकारक असेल. रस्त्यावरील बेवारस वाहने तातडीने टोईंग करून हटवली जातील.
मंडळांनी मंडपासाठी रीतसर परवानगी घ्यावी
'ह' प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड म्हणाले, निर्माल्य व्यवस्थापन, पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणे आणि अवैध पानटपऱ्यांवर धडक कारवाईचे संकेत दिले. मंडप उभारताना व काढताना विशेष खबरदारी घेणे, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, महापालिकेकडून रीतसर परवानग्या घेणे, अधिकृत व वैध वीज जोडणी घ्यावा.
मंडळांकडून प्रशासनाकडे मागणी
सर्व लहान-मोठ्या मंडळांना कायद्याची अंमलबजावणी करताना समान वागणूक द्यावी.
अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसोबतच पदपथावरील स्टॉल हटवणे, रस्त्यांमधील खड्डे तात्काळ बुजवणे, वाहतुकीस अडथळा ठरणारी अवजड ट्रॅव्हल्सची डोकेदुखी थांबवणे.
महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकांची संख्या वाढवणे.
अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण, आवाजाची अचूक मोजणी आणि तरुणांमधील व्यसनमुक्तीच्या प्रचारावर भर दिला.
जुन्या मंडळांना त्वरित परवानग्या देण्याची आग्रही मागणी केली.