

पिंपरी: शहरात अवजड वाहनांच्या नियमबाह्य प्रवेशामुळे बऱ्याचदा वाहतूककोंडी तसेच अपघातांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याबाबीचा विचार करून वाहतूक विभागाने नियम मोडणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा वाहनचालकांकडून 3 कोटीहून अधिक दंड आकारण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर ठराविक वेळेत बंदी घातली आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, नियमभंग करणाऱ्या अवजड वाहनचालकांकडून तब्बल 3 कोटी 2 लाख 98 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे. नागरिकांच्या मते, अशा प्रकारच्या कडक कारवाईमुळे वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. विशेषतः शाळा, कार्यालयीन वेळेत होणारी गर्दी लक्षात घेता अवजड वाहनांवरील निर्बंध महत्त्वाचे ठरत आहेत.
मार्च महिन्यात सर्वाधिक कारवाई
एकूण 10,053 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईतून 1 कोटी 37 लाख 18 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेष मोहिमांमुळे नियमभंग करणाऱ्यांची संख्या उघड झाली. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापन हे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन केल्यासच वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
शहरात वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. तसेच अपघात देखील वाढत आहेत. त्याधर्तीवर अवजड वाहनांसाठी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाइचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
विवेक पाटील, पोलिस उपआयुक्त वाहतूक शाखा