

पिंपरी: आरटीई प्रवेशासाठी कागदपत्र तपासणीसाठी सोमवार (दि. 20) अंतिम मुदत होती; मात्र दिलेल्या मुदतीमध्ये बहुतांश पालकांची कागदपत्र पडताळणी अपूर्ण राहिल्याने, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोमवार (दि. 20) कागदपत्र पडताळणीची अंतिम मुदत म्हणून आकुर्डीतील कै. वसंतदादा पाटील विद्यामंदिर याठिकाणी पालकांची गर्दी झाली होती. आरटीई प्रवेशाची लॉटरी 10 एप्रिल रोजी काढण्यात आली. त्यानंतर कागदपत्र तपासणीला सुरुवात झाली. दहा दिवसांत पालकांची कागदपत्र पडताळणीसाठी दमछाक झाली. पालकांना देण्यात आलेल्या टोकनप्रमाणे पालकांनी येवून कागदपत्र तपासणी करायची होती.
कागदपत्र पडताळणीसाठी दहा दिवस हा खूपच कमी कालावधी असल्याने पालकांची पडताळणीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होती. पडताळणी केंद्रावर झालेली गर्दी पाहता बहुतांश पालकांची कागदपत्रं पडताळणी करण्याचे काम अपूर्ण राहिले होते. कागदपत्रं तपासणीशिवाय शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. कागदपत्र पडताळणीसाठी पालकांना टोकन देण्यात आले आहे. वेळेत कागदपत्र तपासणी होते की नाही, यामुळे पालकवर्गात चिंता होती. कामगदपत्र पडताळणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.