

पिंपरी: आकुर्डीतील कै. वसंतदादा पाटील विद्या मंदिर याठिकाणी आरटीई प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी करण्यासाठी आलेल्या पालकांना पुन्हा शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसला.
भर उन्हात रांगेत उभे राहून पालकांसह आलेल्या मुलांचेही हाल झाले. आजही टोकणवरून केंद्रावर गोंधळ उडाला. या वेळी महापौर रवी लांडगे यांनी पाहणी केली. तसेच, उन्हाळ्याचे दिवस असल्याने याठिकाणी मंडप आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पिण्याच्या पाण्याची सोय नाही
सुरुवातीला कागदपत्र तपासणी समिती गठीत न करता फक्त कागदपत्र जमा करून घेण्यात आले होते. सध्या कागदपत्र पडताळणीची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे पडताळणीचे नियोजन विस्कटले आहे. याचा फटका पालकांना बसत आहे. तपासणीसाठी वारंवार फेऱ्या मारुन पालकांची फरफट होत आहे. त्यांच्याह आलेल्या चिमुरड्यांचेदेखील उन्हात हाल होत आहेत. दिवसभर एकाच ठिकाणी बसून मुले कंटाळली होती. याठिकाणी सावली आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पालक व मुलांची गैरसोय झाली.
पालकांची गर्दी
कागदपत्र पडताळणीची मुदत 20 एप्रिलपर्यंत देण्यात आली आली आहे. कागदपत्र तपासणीशिवाय शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. इतक्या कमी मुदतीत पालकांना कागदपत्रातील त्रुटी आणि दुरुस्ती करण्यासाठी वेळ कमी पडत आहे. यासाठी टोकण घेणारे आणि कागदपत्रे घेऊन आलेल्या पालकांची एकच गर्दी झाली होती. टोकण नसणाऱ्या पालकांचेदेखील अर्ज भरून घेतल्याने पालकांमध्ये गोंधळ सुरू झाला. महापौरांनी पाहणी केल्यानंतर पालकांना सुविधा देण्याच्या सूचना केल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने याठिकाणी मंडप आणि पिण्याच्या पाण्याची सोयी करण्यास सांगितले आहे.
आम्ही एक हजार पालकांना टोकण दिले आहेत. आज इंटरनेट बंद होते, साईट हँग होत होती. केंद्रावर कागदपत्र सबमिट करणारे, टोकण घ्यायला येणारे आणि टोकणवरची तारीख न पाहता आधीच आलेल्या पालकांमुळे गर्दी झाली होती.
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण विभाग