

खराळवाडी: महापालिका भवनासमोरील पिंपरीकडून निगडीकडे जाणारे व दापोडीकडे जाणारे दोन्ही पीएमपीएमएल बसथांब्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसथांब्याभोवती मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, सर्वत्र धूळ पसरलेली आहे. तसेच बसथांब्यातील विविध साहित्याची तुटफूट झाल्याने त्याचे विद्रूप चित्र दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून बसथांबे सुस्थितीत आणावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
या बसथांब्यावर पिंपरी शगुन चौक, डिलक्स चौक, काळेवाडी, राहटणी, चिंचवड, मोरवाडी, लालटोपीनगर, आकुर्डी, काळभोरनगर, निगडी भक्ती-शक्ती जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला या बसथांब्यांचा वापर करतात. मात्र, बसथांब्याच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढलेले गवत आणि धुळीमुळे नागरिकांना बसची वाट पाहताना त्रास सहन करावा लागत आहे. बसथांब्यावरील बाक, पत्रे व इतर साहित्यही तुटलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
देखभाल दुरुस्तीकडे कानाडोळा
विशेष म्हणजे, महापालिका भवनासमोरील बसथांब्यांची अशी अवस्था असल्याने प्रशासनाच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहर स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचा संदेश देणाऱ्या महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील बसथांबेच दुर्लक्षित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिकेने तातडीने गवत काढणे, परिसराची स्वच्छता करणे, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करणे तसेच तुटलेले साहित्य बदलून बसथांबे सुस्थितीत आणावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
शेडच्या छताची मोडतोड
महापालिकेच्या समोरील बसथांब्यांच्या शेडची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. बसशेडच्या छताचा भाग वाहनांची धडक बसून निखळला आहे. आसन व्यवस्था तसेच दरवाजे खराब झाले आहेत. बसथांब्याची साफसफाई केली जात नसल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. यामुळे पीएमपीने प्रवास करणार्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
महापालिका भवनासमोरील दोन्हीही बाजूचे बसथांबे शहराची ओळख आहेत. मात्र, त्यांची झालेली दुरवस्था पाहून प्रशासनाच्या दुर्लक्षाची प्रचिती येते. प्रवाशांच्या सुविधेसाठी तातडीने स्वच्छता, दुरुस्ती आणि नियमित देखभाल करण्यात यावी.
प्रशांत यादव, प्रवासी.
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. संबंधित बसथांब्यावरील अस्वच्छता, वाढलेले गवत, धूळ तसेच तुटफुटीची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. या ठिकाणी तातडीने साफसफाई करण्यात येईल. वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ केला जाईल. तसेच बसथांब्याची रंगरंगोटी, तुटलेल्या साहित्याची दुरुस्ती व आवश्यक देखभाल करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी नियमित स्वच्छता व देखभालीवर भर दिला जाईल.
नितीन तुपे, आरोग्य निरीक्षक, महापालिका