

पिंपरी: पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियान 5.0 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस 10 कोटींचे बक्षीस मिळाले अहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महापौर रवी लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वीकारले.
या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच ,पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, पर्यावरण व आरोग्य विभागाचे अधिकारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियान 5.0 मध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक मिळविला.
अभियानाअंतर्गत भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित विविध पर्यावरणीय निकषांवर शहरांची कामगिरी तपासण्यात आली. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन, स्त्रोतस्थानी कचरा विलगीकरण, निर्माल्य पुनर्प्रक्रिया प्रकल्प, एकल-वापर प्लास्टिकमुक्त मोहीम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलसंधारण उपक्रम, सौरऊर्जा वापर तसेच, हरित पटा विस्तार या क्षेत्रांत प्रभावी अंमलबजावणी केली. शहरातील पर्यावरणीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणताना प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. व्यापक जनसहभागाला विशेष प्राधान्य दिले.
नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभागाचे फलित
महापालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविणे हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात शहराने सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध व परिणामकारक कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. हे यश केवळ महापालिकेचे नसून शहरातील नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, उद्योगक्षेत्र व सर्व घटकांच्या सक्रिय सहभागाचे फलित आहे, असे महापौर रवी लांडगे म्हणाले.
पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा निर्धार
शाश्वत विकासाच्या दिशेने शहराची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन, पारदर्शक अंमलबजावणी व जनसहभाग यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणीय निकषांमध्ये उल्लेखनीय सुधारणा साधली आहे. भविष्यातही हरित, स्वच्छ व पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा आमचा निर्धार कायम राहील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.