

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वासीएम) रुग्णालयात 1 जानेवारी ते डिसेंबर 2025 या एक वर्षाच्या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत तब्बल तीन हजार 318 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्याचा लाभ गरजू व सर्वसामान्य रुग्णांना झाला आहे. त्यासाठी महापालिकेकडून 9 कोटी 24 लाख 53 हजार 900 रुपयांचा खर्च झाला आहे.
608 जणांवर शस्त्रक्रिया
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. वायसीएम रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर आणि सर्व यंत्रणा उपलब्ध असल्याने या योजना चांगल्या पद्धतीने चालविल्या जातात. एक जानेवारी ते आजअखेर एकूण 3 हजार 318 मोफत उपचार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 608 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर, इतर रुग्णांवर विविध प्रकारे उपचार करण्यात आले आहेत.
वायसीएम रुग्णालयात सन 2012 पासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. कोरोना महामारीमध्ये या योजनेअंतर्गत रुग्णालयात तब्बल 5 हजार 500 रुग्णांना मोफत तसेच, कॅशलेस पद्धतीने उपचार देण्यात आले होते. रुग्णालय व्यवस्थापन, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचे पुरवठादार व डॉक्टर यांच्या सुयोग्य नियोजनामुळे रुग्णांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यात महापालिका यशस्वी ठरली आहे. त्यामुळे शहरातील तसेच, राज्यातून येणाऱ्या गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून महापालिका आणि वायसीएम रुग्णालयाचे कौतूक होत आहे
लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनाअंतर्गत 5 लाखांपर्यंत उपचार दिला जातो. सर्व प्रकारचे रेशनकार्डधारक किंवा रेशनकार्ड उपलब्ध नसल्यास रहिवासी प्रमाणपत्र किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आवश्यक आहे. आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी व महिला आश्रमातील महिला वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे. पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीयांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वैध ओळखपत्र आवश्यक आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे वैध ओळखपत्र आवश्यक आहे. कर्नाटक सीमावर्ती जिल्ह्यांतील रहिवाशांना (बेळगाव, कारवार, कलबुर्गी, बिदर) रेशनकार्ड किंवा रहिवासी किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आवश्यक आहे. रस्ते अपघातांमधील रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्मान भारतअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. आपत्कालीन रुग्णांसाठी विशेष तरतूद आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास टेलिफोनिक इंटिमेशनद्वारे तात्काळ उपचार सुरू करण्यात येतात.
कोणताही रुग्ण केवळ आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनांच्या माध्यमातून वायसीएम रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर, दर्जेदार व मोफत उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे.
डॉ. सूर्यकांत मुंडलोड, समन्वयक, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, वायसीएम रुग्णालय
अस्थिरोग शस्त्रक्रियेचा अनेकांना फायदा
ज्येष्ठ नागरिक घसरून पडणे, लहान मुलांना खेळताना झालेल्या हाडांच्या इजा, वयोमानानुसार होणारी हाडांची झीज, अपघातात मोडलेली हाडे या प्रकारचे रुग्ण वायसीएम रुग्णालयात मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. या रुग्णांना अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेसाठी म्हणजेच इम्प्लांटसाठी काही वैद्यकीय वस्तू व साहित्यांची आवश्यकता भासते. महापालिकेने या वस्तू पुरविण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवत पुरवठादारांची नियुक्ती केली आहे. पुरवठादांने सर्व वस्तू वेळेवर तसेच, उच्च दर्जाच्या पुरविलेल्या रुग्णालयात अस्तिरोगावरील शस्त्रक्रिया 100 टक्के यशस्वी झाल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना या गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी जीवनदायी योजना आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी या योजनांचा पूर्ण व योग्य लाभ घ्यावा. त्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी येताना आवश्यक सर्व कागदपत्रे व वैध ओळखपत्रे सोबत आणावीत. जेणेकरून उपचाराचा लाभ तात्काळ व अडथळ्याविना देता येईल, असे आवाहन महापालिकेने केले आहे.