

लोणावळा: सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे आवडते केंद्र असलेल्या लोणावळा शहराच्या सौंदर्यात भर घालणारे लोणावळा धरण सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. धरणातील पाणी आटल्याने उघड्या पडलेल्या कोरड्या पात्रात काही हुल्लडबाज वाहनचालकांनी स्टंटबाजी सुरू केली असून, यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि सराव करणाऱ्या खेळाडूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
लोणावळा धरणाचा परिसर अत्यंत विहंगम आणि निसर्गरम्य आहे. नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ अल्हाददायक गारवा असतो. याच वातावरणामुळे लोणावळा शहरातील नागरिक तसेच भुशी गाव, रामनगर आणि परिसरातील शेकडो नागरिक येथे फेरफटका मारण्यासाठी येतात. अनेक ज्येष्ठ नागरिक झाडांच्या सावलीत विश्रांती घेतात, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण येथे धावण्याचा सराव करतात. शांत वातावरणात अभ्यास करतात. इतकेच नव्हे, तर महिला आणि लहान मुले सुरक्षित जागा म्हणून येथे सायकलिंग किंवा वाहनचालवायला शिकण्यासाठी येतात.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही तरुण आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट धरणाच्या पात्रात उतरवून अतिवेगाने चालवत स्टंटबाजी करत आहेत. जागेवर गाड्या फिरवत धूळ उडवतात, या स्टंटबाजीमुळे परिसरात धुळीचे प्रचंड लोट तयार होत आहेत. ही धूळ थेट वस्तीत आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या नाका-तोंडात जात असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
नावलौकिकाला लागतंय गालबोट
या स्टंटबाजांमुळे धरणाच्या शांत आणि प्रसन्न वातावरणाला गालबोट लागत आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिकांना या आवाजाचा आणि धुळीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आम्ही येथे व्यायामासाठी आणि मोकळ्या हवेसाठी येतो, पण या स्टंटबाजांमुळे आम्हाला श्वास घेणेही कठीण झाले आहे, अशी भावना स्थानिक नागरिक अनिल कडू यांनी व्यक्त केली. तसेच अनेक सुज्ञ नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे.
या वाढत्या त्रासामुळे परिसरात संतापाची लाट आहे. लोणावळा शहर पोलिसांनी या ठिकाणी नियमित गस्त घालावी आणि विनाकारण स्टंटबाजी करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या उपद्रवींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. संबंधितांनी वेळीच दखल न घेतल्यास या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिक.