

पिंपरी: आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन धनादेश वापरून दोन लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ सप्टेंबर २०२४ ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली.
कीर्ती राजेश सोमाणी (५०), राजेश रामेश्वर सोमाणी (५५, दोघे रा. परभणी) आणि कमलकिशोर मंत्री (६५, रा. कोथरूड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिता भाऊसाहेब कड (६४, रा. बाणेर, पुणे) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीहरी गोविंद प्रतिष्ठानने सदगुरु रामेश्वर सोमाणी यांच्याकडे अध्यात्मिक प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. त्यासाठी संस्थेकडून त्यांना नियमित मानधन दिले जात होते. अध्यात्मिक प्रचारासाठी संस्थेने एकत्रित दोन धनादेश दिले होते. दरम्यान, रामेश्वर सोमाणी यांचे निधन झाल्यानंतर संबंधित धनादेश आरोपींनी स्वतःकडे ठेवून त्यावरील दोन लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.