

पुढारी ऑनलाईन डेस्क : ODI World Cup Schedule : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले जाऊ शकते. आयसीसीने या दिवशी मुंबईत एका जंगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समजते आहे. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे लागले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याकडे अवघ्या जगभरातीय चाहत्यांच्या नजरा आहेत. आता आयसीसीने क्रिकेट चाहत्यांची वेळापत्रकाची प्रतिक्षा संपवली असून 27 जूनला ते जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आयसीसीने माध्यमांना आमंत्रित केले असून या कार्यक्रमाला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील लोअर परळ येथील एस्टर बालरुन, सेंट रेजिस इथे करण्यात आले आहे.
या वर्ल्ड कपचा पहिला सामना अहमदाबादच्या मैदानावर गतविजेता इंग्लंड आणि गेल्या वेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होईल, तर टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरूद्ध रंगणार आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑक्टोंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाईल अशीही चर्चा आहे.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार असून 48 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील 8 संघाना थेट एन्ट्री मिळाली आहे. तर उर्वरित 2 जागांसाठी आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर राउंड खेळवण्यात येत आहे. याचे आयोजन 18 जून पासून झिंबाब्वेमध्ये करण्यात आले आहे. 9 जुलैला अंतिम दोन संघ निश्चित होतील.
टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका असे एकूण 8 संघ हे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. तर 2 जागांसाठी 10 संघात रस्सीखेच आहे. यात झिंबाब्वे, वेस्टइंडिज, श्रीलंका, नेदरलंड, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका आणि यूएई अशा या 10 संघांमध्ये 2 जागांसाठी वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये लढती सुरू आहेत.
भारताने 1996 आणि 2011 साली शेजारील देशांसह विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदा प्रथमच भारत संपूर्ण स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनेही चांगली तयारी केली आहे. भारतीय बोर्डाने यापूर्वीच आयसीसीला स्पर्धेच्या अयोजनाचा मसुदा पाठवला आहे. दरम्यान, पाकिस्तानला या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या दोन साखळी सामन्यांचे ठिकाण बदलायचे होते. पण त्यांची ती मागणी आयसीसी आणि बीसीसीआयने फेटाळून लावली आहे.
8 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, चेन्नई
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर vs न्यूजीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर vs साउथ आफ्रीका, कोलकाता
11 नोव्हेंबर vs क्वालिफायर, बंगळूर