Union Budget | भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी आणि कुणी सादर केला?
पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) उद्या (दि. २३) सादर करणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सादर होणारा हा अर्थसंकल्प अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२ नुसार सरकारने प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वी केंद्रीय किंवा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करणे आवश्यक आहे. तसेच निवडणुकीच्या वर्षात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्प हा आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाशी संबंधित दस्तऐवज आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भारताचा पहिला अर्थसंकल्प (India's first budget) कधी आणि कोणी सादर केला?
'बजेट' शब्द कोठून आला?
'बजेट' हा शब्द फ्रेंच शब्द 'Bougette' वरून आला आहे. फ्रेंचमध्ये याचा अर्थ लहान पिशवी असा असून हा शब्द लॅटिन शब्द 'बुलगा' वरून आला आहे. त्याचा अर्थ 'लेदर बॅग' असा आहे. प्राचीन काळी मोठे व्यापारी आपली सर्व आर्थिक कागदपत्रे एकाच पिशवीत ठेवत असत. त्याचप्रमाणे हळूहळू या शब्दाचा वापर संसाधने एकत्रित करण्यासाठी केलेल्या गणनेशी जोडला गेला. अशा प्रकारे सरकारच्या वार्षिक आर्थिक खात्याला 'बजेट' असे नाव मिळाले.
ईस्ट इंडिया कंपनीने पहिला अर्थसंकल्प सादर केला होता
भारत सरकारने अर्थसंकल्प (India's first budget) सादर करण्याची सुरुवात १९ व्या शतकातच झाली. देशाचा पहिला अर्थसंकल्प १६३ वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीत सादर केला होता. हा अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी मांडला होता. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पहिल्या ३० वर्षांत त्यामध्ये पायाभूत सुविधा या शब्दाचा उल्लेखही नव्हता. २० व्या शतकाच्या सुरूवातीस अर्थसंकल्पात प्रथम हा शब्द समाविष्ट करण्यात आला.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला?
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प १६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. देशाचे पहिले अर्थमंत्री आरके षणमुखम चेट्टी यांनी तो मांडला. भारतीय अर्थव्यवस्थेचा तो एक आढावा अहवाल होता. या अर्थसंकल्पात कोणताही नवीन कर जाहीर करण्यात आला नाही. या अर्थसंकल्पाच्या एकूण रक्कमेपैकी सुमारे ४६ टक्के म्हणजे अंदाजे ९२.७४ कोटी रुपये संरक्षण सेवांसाठी वाटप करण्यात आले होते.
एका शास्त्रज्ञांनी मांडली अर्थसंकल्पाची संकल्पना
स्वतंत्र भारताच्या अर्थसंकल्पाची संकल्पना प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी मांडली होती. स्वतंत्र भारताच्या अर्थसंकल्पाची संकल्पना त्यांनीच तयार केली होती. ते भारतीय शास्त्रज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ होते. लंडनच्या केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या दोन्ही विषयांत पदव्या मिळवल्या होत्या. ते भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्यही राहिले आहेत. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या आर्थिक नियोजन आणि सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाच्या सन्मानार्थ भारत सरकार दरवर्षी २९ जून हा त्यांचा जन्मदिन 'सांख्यिकी दिन' म्हणून साजरा करते.
...जेव्हा देशाचा अर्थसंकल्प लीक झाला होता
१९५० मध्ये सभागृहात सादर होण्यापूर्वीच भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प लीक झाला होता. त्यानंतर अर्थसंकल्प छपाईचे काम राष्ट्रपती भवनातून मिंटो रोडवरील प्रेसमध्ये हलवण्यात आले. १९८० पासून नॉर्थ ब्लॉकमधील सरकारी प्रेसमधून बजेट छापले जाऊ लागले.
हिंदीत अर्थसंकल्प कधी सुरू झाला?
पूर्वी अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रे इंग्रजीतच छापली जात होती. १९५५-५६ पासून ते इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये छापले जाऊ लागले.