![‘मला माफ करा…’: ‘बीजेडी’च्या पराभवानंतर व्हीके पांडियन यांची राजकारणाला सोडचिठ्ठी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-194.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक हे ओडिशाचे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही तर मी सक्रीय राजकारण सोडणार, अशी घोषणा व्हीके पांडियन यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. यानंतर पांडियन यांनी आज सक्रीय राजकारण सोडणार असल्याची घोषणा केली आहे.
आता मी जाणीवपूर्वक सक्रिय राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासात माझ्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करा. माझ्याविरुद्धच्या या मोहिमेच्या राबवून बीजेडीच्या नुकसानात भूमिका बजावली असेल तर मला माफ करा," असे व्हीके पांडियन यांनी पाेस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
व्हीके पांडियन हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी. ओडिशा केडरचे 2000-बॅचचे IAS अधिकारी होते. २००२ मध्ये त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कालाहंडी जिल्ह्यातील धर्मगढचे उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. 2005 मध्ये ते मयूरभंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले. २००७ मध्ये त्यांना गंजमचे जिल्हाधिकारी झाले. गंजममध्ये जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून एड्सग्रस्त व्यक्तींसाठी कार्य करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. येथील कार्यकाळातच ते मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मर्जीतील आयएएस अधिकारी म्हणूनही ओळखले जावू लागले. यानंतर २०११ मध्ये नवीन पटानयक यांनी त्यांना खासगी सचिव म्हणूनही नियुक्त केले. तेव्हापासून ओडिशाच्या राजकारणात पाडियन यांच्या नावाला वलय प्राप्त झाले.
मागील वर्षी त्यांनी आयएएस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानंतर अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्री पदावर 5T (परिवर्तनात्मक उपक्रम) आणि 'नबिन ओडिशा' चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. पांडियन थेट मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करतील, असे अधिकृत आदेशात म्हटले होते. मात्र यानंतर ते अनेक वादात सापडले. विरोधी पक्षांनी आरोप केला हाेता की, पांडियन यांनी राजकीय फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला.
पांडियन यांनी आयएएससेवेत रुजू झाल्यापासून गेल्या २० वर्षांत पटनायक सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांच्या पुनर्वसनासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. PWD च्या सक्षमीकरणासाठी 'एकल खिडकी प्रणाली' हे राष्ट्रीय मॉडेल म्हणून हाती घेण्यात आली. ही योजना देशभर लागू करण्यात आली. त्यांनी श्री जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉरसारख्या मेगा प्रोजेक्टमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीमंदिरासोबतच पांडियन यांनी राज्यभरातील प्राचीन आणि पूज्य मंदिरांच्या जीर्णोद्धार उपक्रमही राबवला हाेता. सप्टेंबरमध्ये पांडियन यांनी राज्यातील सर्व 147 विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला होता. दौऱ्यांदरम्यान त्यांनी स्थानिक लोकांशी त्यांच्या गंभीर समस्यांबद्दल चर्चा केली आणि 5T कार्यक्रमांतर्गत त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हेरिटेज पर्यटन स्थळांना भेट दिली होती.
ओडिशा राज्यातील प्रशासनासह बिजू जनता दलामध्येही पांडियन यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी, असा प्रचारही विरोधी पक्षांनी केला. तसेच मूळचे तामिळनाडूचे असणारे पांडियन हे ओडिशाचे सर्वेसर्वा बनू पाहत आहेत, असा आरोपही केला जावू लागला हाेता. यानंतर सर्व चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी ओडिशा विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी पांडियन हे माझे उत्तराधिकारी नाहीत, असें बिजू जनता दल (बीजेडी) चे अध्यक्ष आणि ओडिशाचे तत्कालिन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 'एएनआय'शी बोलताना स्पष्ट केले होते.