

Telangana Education department viral news
तेलंगणा: सरकारी नियम म्हणजे नियम... असे म्हणतात; पण नियम पाळण्याच्या नादात एक अजब घटना तेलंगणात घडली आहे. नागकरुनूल जिल्ह्यातील शिक्षण विभागाने केवळ एका विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र उभारले होते. मात्र, परीक्षेच्या दिवशी ज्याच्यासाठी ही सर्व तयारी केली होती, तो विद्यार्थीच आला नाही. यामुळे केंद्रावर उपस्थित असलेले कर्मचारी केवळ वाटच पाहत राहिले.
कामारी वरुण संदेश, असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो 'इंटरमीडिएट ब्रिज कोर्स'ची गणिताचा पेपर देणार होता. अधिकृत नियमांचे पालन करत, या विद्यार्थ्यासाठी विभागाने एका विशेष परीक्षा केंद्राची व्यवस्था केली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी पर्यवेक्षक आणि निरीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली. सर्व काही सज्ज होते.
एका शाळेचे परीक्षा केंद्रात रूपांतर करण्यात आले होते. बेंच व्यवस्थित मांडण्यात आले होते. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जागेवर ठेवण्यात आल्या होत्या. कर्मचारी त्या विद्यार्थ्याची वाट पाहत होते. मात्र, प्रशासनाचे हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले; कारण संबंधित विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आलाच नाही. यामुळे केंद्रावर उपस्थित असलेले कर्मचारी परिक्षेची वेळ होईपर्यंत केवळ वाटच पाहत राहिले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. "एवढी व्हीआयपी वागणूक मिळूनही परीक्षार्थीने दांडी मारली," असा टोला काहींनी लगावला आहे. तर काहींनी एका विद्यार्थ्यासाठी पाच कर्मचाऱ्यांचा वेळ आणि सरकारी खर्चाचा अपव्यय झाल्याने यावर नाराजी व्यक्त केली आहे. "जिथे गोंधळ नाही आणि कॉपीची शक्यताच नाही, तेच केंद्र अखेर निरुपयोगी ठरले," अशी टिप्पणी एका युजरने केली.
प्रशासनाने या विद्यार्थ्याच्या अनुपस्थितीला दुजोरा दिला असून, तो का गैरहजर राहिला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नियमांचे पालन करणे आवश्यक असले तरी, एका व्यक्तीसाठी एवढी यंत्रणा राबवणे कितपत व्यावहारिक आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.