Shashi Tharoor: नेहरूंच्या निर्णयांमुळे १९६२ मध्ये भारताचा चीनकडून पराभव; शशी थरूर नेमकं काय म्हणाले?
Shashi Tharoor
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रत्येक धोरणाशी सहमत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना दोष देणे चुकीचे आहे. १९६२ च्या चीन युद्धातील पराभवामागे त्यांचे काही निर्णय कारणीभूत असू शकतात. पण, भारतीय जनता पक्ष हा नेहरू-विरोधी आहे आणि कोणत्याही मुद्द्यासाठी त्यांना जबाबदार धरले जाते, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात थरूर यांनी नेहरूंच्या वारशाबद्दल भाजपच्या भूमिकेवर भाष्य केले. 'एएनआय'च्या वृत्तानुसार ते म्हणाले, "मी जवाहरलाल नेहरूंचा चाहता आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्यावर टीका करू शकत नाही. मी त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि विचारांचे खूप कौतुक करतो. माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. तरीही, मी त्यांच्या सर्व गोष्टींचे आणि धोरणांचे १०० टक्के समर्थन करत नाही. त्यांनी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या कौतुकास पात्र आहेत."
ते पुढे म्हणाले, "सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहरूच होते ज्यांनी भारतात लोकशाही प्रस्थापित केली. मी असे म्हणणार नाही की सध्याचे सरकार लोकशाहीच्या विरोधी आहे, पण ते नेहरू-विरोधी नक्कीच आहे. नेहरूंना एक सोपा 'बळीचा बकरा' बनवण्यात आले आहे."
थरूर यांनी असेही नमूद केले की, "काही प्रकरणांमध्ये मोदी सरकारकडून होणाऱ्या टीकेला आधार असू शकतो. उदाहरणार्थ, १९६२ मध्ये चीनविरुद्ध झालेल्या पराभवाचे कारण नेहरूंचे काही निर्णय असू शकतात."
पक्षीय भूमिकेवर दिले स्पष्टीकरण
शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कधीही पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन काम केलेले नाही. ते म्हणाले, "मी पक्षाच्या विचारधारेचे उल्लंघन केले असे कोणी म्हटले? मी विविध विषयांवर माझी मते मांडली आहेत, परंतु बहुतांश प्रकरणांमध्ये पक्ष आणि मी एकाच भूमिकेवर ठाम आहोत." थरूर यांनी पुढे सांगितले की, त्यांनी संसदेत मंत्र्यांसमोर जे प्रश्न उपस्थित केले होते, त्यांची दिशा स्पष्ट होती आणि पक्षाने त्यावरून अस्वस्थ होऊ नये.

