

WhatsApp Status Case
जबलपूर : सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर केलेली कविता शेअर करणे हा गुन्हा नाही. संबंधित कवितेमध्ये धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा किंवा द्वेषभाव वाढीस लावल्याचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ नाही, त्यामुळे ही कविता आक्षेपार्ह मानण्यास कोणताही वाव उरत नाही, असे स्पष्ट करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या (Madhya Pradesh High Court) जबलपूर खंडपीठाने (Jabalpur Bench) शिक्षकावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.
'बे-हया' या शीर्षकाची एक उर्दू कविता वाचतानाचा स्टेटस मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील चिचोली शहरातील शिक्षक फैजान अन्सारी यांनी ठेवला होता. पोलिसांनी या स्टेटसचे वर्णन "महिला-विरोधी" असे करत गुन्हा दाखल केला होता. तसेच, WhatsApp स्टेटसद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी केलेल्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेत अन्सारी यांनी म्हटलं होतं की, २२ जुलै २०२५ रोजी संबंधित व्हिडिओ WhatsApp स्टेटसवर ठेवण्यात आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी त्याला चिचोली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला होता आणि त्याला कथितरित्या त्रास दिला गेला होता.
अन्सारी यांच्या वकिलांनी युक्तिवादावेळी सांगितले की, संबंधित कविता सुप्रसिद्ध आहे. ही कविता कोणतीही वैयक्तिक टिप्पणी न करता किंवा कोणत्याही प्रकारची चिथावणी न देता वाचली गेली होती. त्यामध्ये गुन्हेगारी उद्देशाने कविता व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवण्याचा दावाच चुकीचा आहे. हिंसाचार भडकवणारे किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारे कोणतेही ठोस पुरावे (सामग्री) उपलब्ध नसल्यामुळे, हे प्रकरण फौजदारी खटल्याचा आधार ठरू शकत नाही. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा अस्पष्ट, सर्वसाधारण आणि व्यक्तिनिष्ठ आरोपांवर आधारित दाखल करण्यात आला आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ही याचिका 'अकाली' (वेळेपूर्वी दाखल केलेली) आहे आणि या टप्प्यावर ती सुनावणीस पात्र नाही. वकिलांनी असा दावा केला की, पोलिसांनी कायद्यानुसार आपला तपास पूर्ण करण्यास परवानगी दिली जावी आणि त्यात न्यायालयाचा हस्तक्षेप नसावा.
अशाच प्रकारच्या दोन मागील प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा संदर्भ देत, न्यायमूर्ती बी.पी. शर्मा यांनी स्पष्ट केले की, "संबंधित कविता संपूर्णपणे वाचल्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई स्पष्ट होत नाही, कारण या कवितेमध्ये कोणत्याही धर्माचा, समुदायाचा किंवा पंथाचा असा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ नाही, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा किंवा द्वेषभाव वाढीस लावल्याचा आरोप करता येईल. अशा प्रकारची उर्दू कविता व्हॉट्सॲपवर शेअर करणे हा गुन्हा नाही."
आपल्याला समाजमाध्यमे आणि स्थानिक प्रसारमाध्यमांवरून एका द्वेषपूर्ण जनमोहिमेचा सामना करावा लागत आहे. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत, असेही याचिकाकर्ते अन्सारी यांनी न्यायालयास सांगितले. यावेळी न्यायालयाने बैतुलच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना अन्सारी यांना संरक्षण पुरवण्याचे निर्देशही दिले.