

India-Russia Defense Pact
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील नवीन लष्करी कराराची अंमलबजावणी अधिकृतपणे सुरू झाली आहे. या करारातील तरतुदीनुसार आता दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर आपले सैनिक, युद्धनौका आणि लष्करी विमाने तैनात करू शकतील. या संरक्षण करारामुळे भारत आणि रशियाला एकमेकांच्या देशात कोणत्याही एका वेळी जास्तीत जास्त ३,००० सैनिक, ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमाने तैनात करण्याची परवानगी मिळाली आहे. हा संरक्षण करार उभय राष्ट्रांमधील मैत्रीचे 'नवीन पर्व' मानले जात आहे.
रशियाच्या शासकीय पोर्टलनुसार, भारत आणि रशिया नवीन कराराची अंमलबजावणी १२ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. यापूर्वी, या कराराला मंजुरी देणारे विधेयक डिसेंबर २०२५ मध्ये रशियाच्या संसदेत मंजूर करण्यात आले होते. हा संरक्षण करार पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील; तसेच, परस्पर संमतीने या कराराचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे.
'फर्स्टपोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-रशिया नवीन संरक्षण करार दोन्ही देशांना एकमेकांच्या लष्करी सुविधांचा वापर करण्यास अनुमती देईल. यामध्ये हवाई तळ आणि बंदरांचा वापर यांचा समावेश आहे. भारताला उपलब्ध होणाऱ्या रशियाच्या हवाई तळांमध्ये आर्क्टिक प्रदेशातील तळांचाही समावेश आहे. भारताला हा प्रदेश वापर करण्याची संधी मिळेल; तर त्या बदल्यात, रशियाला भारताच्या लष्करी तळांचा वापर करण्याचा अधिकार प्राप्त होईल.
भारत आणि रशिया यांच्यातील या संरक्षण करारामध्ये संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि मानवतावादी मोहिमांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, लष्करी कर्मचारी आणि उपकरणांच्या तैनातीसाठीचे नियम, तसेच जवानांना पुरवल्या जाणाऱ्या रसद पुरवठ्याचे स्वरूप या करारात स्पष्ट करण्यात आले आहे. युद्धनौकांच्या बाबतीत बंदरांचा वापर, दुरुस्ती सुविधा आणि पाणी, अन्न व तांत्रिक संसाधने यांसारख्या अत्यावश्यक पुरवठ्याचा समावेश आहे. लष्करी विमानांच्या बाबतीत, हा करार हवाई वाहतूक नियंत्रण सेवा, नेव्हिगेशन प्रणाली आणि उड्डाणाशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देतो.
भारत-रशिया संरक्षण कराराचा मुख्य उद्देश दोन्ही राष्ट्रांमधील लष्करी सहकार्य अधिक दृढ करणे हा आहे. विशेषतः, हा करार भारताकडे सध्या असलेल्या रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रे आणि लष्करी साहित्याची देखभाल व वापर सुलभ करेल. शिवाय, दीर्घकालीन परदेशातील तैनाती समजून घेण्यासही तो सहाय्यभूत ठरेल.