

हरियाणात अखिल भारतीय प्रतिनिधी सभा
सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रय होसबळे यांची उपस्थिती
पानिपत (हरियाणा):
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या कार्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात 5 हजारांहून अधिक नवीन शाखा सुरू झाल्या असून, संघाची भौगोलिक उपस्थितीही 4 हजारांपेक्षा अधिक ठिकाणी वाढली आहे.
हरियाणातील समालखा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघप्रमुख मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे सहभागी झाले आहेत. संघाच्या आगामी शताब्दी वर्षासाठीची कार्ययोजना अंतिम करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहसरकार्यवाह, कार्यकारिणी सदस्य आणि विविध पदाधिकारी सहभागी झाले आहेत. देशभरातून सुमारे 1,489 प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहणार असून, संघाशी संबंधित 32 संघटनांचे पदाधिकारीही यात सहभागी होत आहेत.
‘पंच परिवर्तन’
अभियानावर विशेष भर
प्रतिनिधी सभेत संघाच्या विविध प्रांतांमधील 2025-26 या कालावधीतील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच शाखांमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘पंच परिवर्तन’ या सामाजिक परिवर्तन मोहिमेवर विशेष चर्चा होणार आहे. आगामी वर्षासाठी संघ शिक्षण वर्ग, कार्यकर्ता विकास वर्ग आणि इतर प्रशिक्षण कार्यक्रमांची रूपरेषाही निश्चित केली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर संयमित भूमिका
मुकुंद सी. आर. यांनी अमेरिका-इस्रायल-इराण तणावाबाबत बोलताना सांगितले की, या प्रश्नावर केंद्र सरकारची जी भूमिका असेल तीच संघाचीही असेल. संघर्ष लवकर संपून शांततापूर्ण तोडगा निघावा, अशी संघाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संघाची स्थापना 1925 मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सहसरकार्यवाह
मुकुंद सी. आर. यांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन वर्षांत संघाच्या कार्यकर्त्यांनी शाखा विस्तारावर विशेष भर दिला. शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विजयादशमी उत्सव, घराघरांत संपर्क अभियान, हिंदू सम्मेलन, युवक मेळावे, नागरिक सभा आणि सामाजिक समरसता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.