

Rahul Gandhi X Post About Indian Two Wheelers Brand :
भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतेच कोलंबियाला भेट दिली. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी भारतातील दुचाकी ब्रँड्सबाबत एक एक्स पोस्ट केली होती. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी भारतीय ऑटोमोबाईल ब्रँड्स बजाज, हिरो आणि टीव्हीएसबाबत हे ट्विट केलं होतं. त्यांनी या कंपन्यांनी क्रोनीजम पेक्षा नाविन्यपूर्णता जपली त्यामुळं या कंपन्या परदेशात देखील चांगली कामगिरी करत असल्याचं सांगितलं.
राहुल गांधी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात, 'बजाज, हिरो आणि टीव्हीएस हे ब्रँड्स कोलंबियात देखील चांगली कामगिरी करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. यांनी दाखवून दिलं आहे की भारतीय कंपन्या देखील क्रोनीजमने नाही तर नाविन्यपूर्णता जपत जग जिंकू शकतात. खूप चांगली कामगिरी!'
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमधून भारतीय कंपन्यांची स्तुती तर केलीच याचबरोबर सत्ताधारी भाजपवर देखील खोचक टोला दिला. काँग्रेस नेते कोलंबियाच्या EIA विद्यापीठात भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी भारतीय प्रशासनात संरचनात्मक दोष असल्यांच सांगितलं होतं. त्यांनी भारताच्या विविधतेच्या परंपरा वृद्धीचा स्कोप दिला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं.
उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'इंजिनिअरिंग आणि हेल्थ केअर क्षेत्रात भारताकडे खूप चांगली क्षमता आहे. त्यामुळं मी आमच्या देशाच्या भविष्याबाबत खूप आशावादी आहे. मात्र याचबरोबर भारताच्या संरचनेत अनेक दोष आहेत ते दूर करणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लोकशाहीवर होणारा हल्ला हे सर्वात मोठं आव्हान आहे.
यानंतर भाजपनं देखील राहुल गांधींवर टीका केली. त्यांनी राहुल गांधी हे अँटी इंडिया आहेत. त्यांनी देशाचा अपमान केला आहे. अशी टीका भाजप नेत्यांनी केली.
भाजपचे वरिष्ठ नेते रवी शंकर प्रसाद म्हणाले, 'राहुल गांधी हे परदेशात आहेत. ते तिथं जाऊन चांगलं बोलले असते तर बरं झालं असतं. मात्र त्यांनी भारतावर टीका केली. त्यांनी जे काही सांगितलं त्याला कोणताही आधार नाहीये. ते म्हणत आहेत की भारतात लोकशाही नाहीये. भारतात पूर्णपणे लोकशाही आहे. मात्र राहुल गांधी यांना सत्ता हवी आहे. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे.'