

Rahul Gandhi on Donald Trump's Ceasefire claim between India and Pakistan during Operation Sindoor
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान ट्रम्प यांच्या दाव्यावर काहीच बोलू शकत नाहीत. काय बोलतील?, की ट्रम्पने युद्ध थांबवलं? ते तसं सांगू शकत नाहीत, पण हीच खरी परिस्थिती आहे. जगभराला माहिती आहे की ट्रम्पने सीझफायर जाहीर केलं. आपण सत्यापासून पळ काढू शकत नाही.”
राहुल गांधी यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 25 वेळा या 'सीझफायर' चा उल्लेख केला असताना, मोदींनी यावर एकदाही उत्तर का दिलं नाही?
“ज्यांना स्वतःला देशभक्त म्हणवून घ्यायचं आहे, ते सध्या कुठे आहेत? पंतप्रधान एकही वक्तव्य करू शकलेले नाहीत. ट्रम्प कोण आहेत? हा त्यांचा कामाचा विषयच नाही. पण तरीही मोदींनी कधीच प्रतिक्रिया दिली नाही. हीच खरी परिस्थिती आहे," असं गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. "आपलं परराष्ट्र धोरण त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे. किती देशांनी आपल्या बाजूने उभं राहिलंय? मोजकंच समर्थन मिळालंय,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधी यांनी असंही सांगितलं की ही फक्त सीझफायरची गोष्ट नाही. देशात अजूनही अनेक महत्त्वाचे विषय आहेत जसे की संरक्षण, संरक्षण उत्पादने आणि ऑपरेशन सिंदूर यावरही चर्चा व्हायला हवी. देशातील परिस्थिती चांगली नाही. संपूर्ण देशाला हे माहित आहे,” असं ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच एका वक्तव्यात पुन्हा दावा केला की त्यांनीच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं. “भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक युद्ध होऊ शकत होतं. त्यांनी एकमेकांची 5 विमाने पाडली होती. मी त्यांना सांगितलं – जर असं केलंत तर व्यापार संपवू आणि त्यांनी थांबवलं. मी युद्ध थांबवलं,” असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, ट्रम्प यांनीच सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीझफायरचे ट्विट केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशाच्या सैन्यांनी समन्वयाने युद्ध थांबवल्याचे सांगितले. पण त्यानंतरही ट्रम्प यांनी वारंवार सीझफायरचे श्रेय स्वतःकडेच घेतले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्ला चढवला. “पहलगामवरील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा करण्यासाठी ठोस तारखा जाहीर करण्यास मोदी सरकार नकार देत आहे.
आणि ट्रम्प यांनी 73 दिवसांत 25 वेळा त्यांनी हे बोललं आहे. पण आपले पंतप्रधान शांत आहेत – फक्त परदेशात प्रवास करतायत आणि देशात लोकशाही संस्था अस्थिर करत आहेत,” असं रमेश यांनी 'X' (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट केलं आहे.