

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १७ सप्टेंबर रोजी आपला ७६ वा वाढदिवस साजरा करणार असून, याअंतर्गत भाजपकडून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प अभियान' राबवले जाईल.
यानिमित्ताने मुंबईत गेटवे ऑफ इंडियासह १० प्रमुख ठिकाणे दिव्यांनी उजळून टाकली जाणार आहेत आणि मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये २५ लाखांहून अधिक दिवे लावले जातील.
भाजपने नागरिकांना पंतप्रधानांच्या नावाने घरात 'आशीर्वादाचा दिवा' लावण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय सेवा आणि जनसहभागाशी संबंधित कार्यक्रम होतील.
पंतप्रधानांचे जन्मस्थान असलेल्या गुजरातमधील वडनगर येथून सेवा संकल्प बाईक यात्रा सुरू केली जाणार आहे. अशाच यात्रेचे आयोजन वाराणसीतही करण्यात आले आहे. सोबतच विविध राज्यांमध्ये लाभार्थ्यांचे कार्यक्रम, रक्तदान, स्वच्छता आणि इतर कार्यक्रम होतील.
मुंबईत दहा ठिकाणी रोषणाई करण्याची योजना आहे. यामध्ये गेटवे ऑफ इंडिया, आरे कॉलनी, बाणगंगा, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यासह इतर ठिकाणांचा समावेश आहे. मुंबई भाजपने त्याला महिनाभर चालणाऱ्या 'सेवा संकल्प अभियाना'चा भाग बनवले आहे.
मिझोराम: मिझोराममध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन गुरुवारी करण्यात आले आहे. तसेच, संध्याकाळी सात वाजता 'आशीर्वादाचा दिवा' कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोलकात्यात ५० हजार लाभार्थी जमतील:
कोलकाता येथील बोईमेला मैदानावर गुरुवारी अन्नपूर्णा योजनेच्या सुमारे पन्नास हजार लाभार्थ्यांना एकत्र आणण्याची तयारी आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला संबोधित करण्याची शक्यता आहे. कोलकात्यामधील अनेक घाटांवर दिवे लावून ते उजळून टाकले जातील.