

PM Modi Delhi Airport : देशभरात आज लाखो विद्यार्थी NEET-UG २०२६ ची परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली असून, पेपर लीकच्या शक्यता लक्षात घेता कडक पाळत ठेवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पश्चिम बंगाल दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान आज (दि. २१) दुपारी साधारण १:१५ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचले. ते थेट आपल्या निवासस्थानी जाणार होते, परंतु NEET परीक्षार्थींची रस्त्यावरील प्रचंड वर्दळ पाहता पंतप्रधान मोदी विमानतळावरच थांबले.
परीक्षा केंद्रांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक जाम किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या उद्देशाने पंतप्रधानांनी दुपारी २ वाजेनंतरच आपल्या निवासस्थानाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी २ वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतरच पंतप्रधान मोदी विमानतळावरून निवासस्थानाकडे रवाना झाले.
देशभरात रविवारी दुपारी २:०० वाजल्यापासून NEET-UG २०२६ ची पुनर्परीक्षा शांततेत सुरू झाली. यंदा उमेदवारांना नेहमीपेक्षा १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला असून, परीक्षेचा एकूण कालावधी ३ तास १५ मिनिटे करण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी देशभरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) माहितीनुसार, भारतातील ५५१ शहरांमधील ५,४४० परीक्षा केंद्रांवर आणि परदेशातील १४ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा इंग्रजीव्यतिरिक्त १२ भारतीय भाषांमध्येही उपलब्ध आहे.
NTA ने परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी व्यापक व्यवस्था केली आहे. एकूण ९५,००० पेक्षा जास्त परीक्षा खंडांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. देशभरात एकूण १,३८,५६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, त्यांचे थेट मॉनिटरिंग (लाइव्ह देखरेख) राष्ट्रीय, राज्य आणि शिक्षण मंत्रालय पातळीवरील व्हर्च्युअल कंट्रोल रूममधून केले जात आहे.एवढेच नाही तर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून होणारी फसवणूक किंवा कॉपी पूर्णपणे रोखण्यासाठी ५१,३११ जॅमर बसवण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांच्या आसपासच्या संवेदनशील भागांत मोठा पोलीस बंदोबस्त, निमलष्करी दल आणि ड्रोनच्या साहाय्याने सुरक्षा कडे तयार करण्यात आले आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
NEET-UG (National Eligibility cum Entrance Test-Undergraduate) ही भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा ३ मे २०२६ रोजी घेण्यात आली होती. परंतु, पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाच्या तपासानंतर NTA ने १२ मे रोजी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशभरात वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.यानंतर १५ मे रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसद आणि माध्यमांद्वारे घोषणा केली की, NEET-UG ची पुनर्परीक्षा २१ जून २०२६ (रविवार) रोजी घेतली जाईल.