

आता जगात असणारे बहुतांश प्लास्टिक आणि इतर कृत्रिम साहित्य पुनर्वापर करण्यायोग्य नाही. त्याचे पुनरुत्पादन करणे कठीण आहे.
plastic pollution crisis
नवी दिल्ली : नष्ट न होणारे प्लास्टिक आज जगाचा 'कर्दनकाळ' बनले आहे, याची माहिती सर्वांनाच आहे. तरीही जगभरात याचा वापर वाढतच आहे. यामुळेच गेल्या अवघ्या १०० वर्षांतील निर्मिती असणाऱ्या प्लास्टिक नावाच्या 'भस्मासुरा'चे वजन हे जगातील सर्व प्राण्यांच्या वजनापेक्षा अधिक झाले आहे, असा धक्कादायक खुलासा नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अविनाश मंजुला-बसवन यांनी केला आहे. 'वर्ल्ड गव्हर्नमेंट्स समिट'मध्ये त्यांनी प्लास्टिकचे पृथ्वीवरील भयावह वास्तवच मांडत सर्वांनाच विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.
यावेळी डॉ. मंजुला-बसवन यांनी स्पष्ट केले की, "प्लास्टिकचा शोध लागून जेमतेम १०० वर्षे झाली आहेत, पण इतक्या कमी काळात आपण इतके प्लास्टिक बनवले आहे की, त्याचे वजन आता पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या एकूण वजनापेक्षाही जास्त झाले आहे. ही आकडेवारी आपल्याला सांगते की, आपल्या कारखान्यांनी आणि उद्योगांनी पर्यावरणाचे किती प्रचंड नुकसान केले आहे."
मानवनिर्मित वस्तू नैसर्गिक जैववस्तुमानाशी अधिकाधिक स्पर्धा करत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त होत आहेत. झाडे, झुडपे आणि वनस्पतींच्या जागतिक वस्तुमानाचा अंदाज सुमारे ९०० गिगाटन आहे, तर इमारती, रस्ते आणि औद्योगिक संरचनांसारख्या मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे वजन सुमारे एक टेराटन असल्याचा अंदाज आहे. १ ट्रिलियन टन (सुमारे १ लाख कोटी) असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी एक प्रमुख चिंता व्यक्त करण्यात आली की, आता जगात असणारे बहुतांश प्लास्टिक आणि इतर कृत्रिम साहित्य पुनर्वापर करण्यायोग्य नाही. त्याचे पुनरुत्पादन करणे कठीण आहे. परिणामी ते कचराभूमी, महासागर आणि परिसंस्थेमध्ये जमा होतात, ज्यामुळे प्रदूषण, जैवविविधतेचे नुकसान आणि हवामानाशी संबंधित धोके वाढतात.
डॉ. मंजुला-बसवन यांनी स्पष्ट केले की, "मानवनिर्मित चुकांमुळेच पर्यावरणावर प्रचंड ताण येत आहे. सध्या अशा पद्धतीने वस्तूंची निर्मिती होते की, वस्तू फक्त तयार केल्या जातात, वापरल्या जातात आणि नंतर कचरा म्हणून फेकून दिल्या जातात; त्यांचा पुनर्वापर खूपच कमी होतो. ही समस्या केवळ कचऱ्यापुरती मर्यादित नाही. प्लास्टिकसारख्या वस्तू बनवण्यासाठी पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांचा (जीवाश्म इंधन) मोठा वापर होतो. यामुळे हवेत घातक वायू पसरतात आणि पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे."
"प्लास्टिकचे प्रदूषण आता फक्त जमिनीवर राहिलेले नाही, तर ते समुद्र, माती आणि अन्नावाटे आपल्या शरीरातही (मायक्रोप्लास्टिक्सच्या रूपात) पोहोचले आहे. डॉ. मंजुला-बसवन यांच्या मते, केवळ सरकार किंवा आंतरराष्ट्रीय करारांनी पर्यावरणाचे रक्षण होणार नाही; हे आपल्या सर्वांचे मिळून एक आव्हान आहे. आपण जसे वागतो आणि ज्या गोष्टींना महत्त्व देतो, सरकार तसेच निर्णय घेते. त्यामुळे जोपर्यंत सामान्य माणसे जागरूक होत नाहीत आणि आपली जबाबदारी ओळखून वागण्यात बदल करत नाहीत, तोपर्यंत पर्यावरणाचे हे संकट दूर होणार नाही," असेही डॉ. मंजुला-बसवन यांनी सांगितले.
डॉ. मंजुला-बसवन यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन शोध नक्कीच गरजेचे आहेत, पण तेवढे पुरेसे नाहीत. जोपर्यंत प्रत्येक माणूस स्वतःची जबाबदारी ओळखून वस्तूंचा वापर मर्यादित करत नाही आणि उद्योग त्यांच्या उत्पादनाच्या पद्धती बदलत नाहीत, तोपर्यंत खरा बदल घडणार नाही."