

नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या एकूण १,१९१ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच ६२९ प्रकल्प मुदतीत पूर्ण झालेले नाहीत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, प्रकल्प रखडण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असून राजयातील ६० महामार्ग प्रकल्पांची मुदत उलटून गेली आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या एका उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकूण ११७ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यापैकी ६० प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाहीत. या यादीत कर्नाटक दुसऱ्या स्थानावरून ७७ पैकी ४७ प्रकल्प, तर उत्तर प्रदेशातील ८७ पैकी ४४ प्रकल्प वेळेत पूर्ण झालेले नाहीत.
जमीन संपादन, वन आणि पर्यावरण विभागाच्या परवान्या मिळण्यातील विलंब, स्थानिक वाद आणि कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे रेंगाळल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ही आकडेवारी केवळ सध्या सुरू असलेल्या (Under-construction) राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आहे. ज्या प्रकल्पांचे कंत्राट रद्द झाली आहेत किंवा कामे पूर्णपणे थांबवण्यात आली आहेत, त्यांचा यात समावेश नाही. दिल्ली, चंदीगड, दादरा-नगर हवेली आणि पुदुचेरी यासारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मात्र एकही प्रकल्प रखडलेला नाही. महामार्गांच्या या विलंबांमुळे वाहतूक कोंडीसोबतच प्रकल्पांचा खर्च वाढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.