

Operation Sindoor : The world must show zero tolerance for terrorism
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला होता. याचा बदला अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला आहे. भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेतल्या नउ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. ही कारवाई रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास केली.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवादाचे कंबरडे मोडण्याला सुरूवात केली आहे. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आले. या सर्व ऑपरेशनवर आता परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाबाबत जगाने झिरो टॉलरन्स नीती दाखवली पाहिजे. त्यांनी ही एकच लाईन ट्वीट करत जगानेही दहशतवादाला थारा न देता, अशीच नीती राबावायला हवे अस म्हटलं आहे.
गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप २६ लोकांना गोळ्या झाडून ठार केले होते. यामध्ये १७ जण जखमी झाले होते. हा हल्ला पहलगाम खोऱ्यातील बैसरन खोऱ्यात करण्यात आला होता. यावेळी या दहशतवाद्यांनी टिपून-टिपूर भारतीयांना लक्ष्य केले होते.
या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. भारतानेही या गोष्टीची गंभीर दखल घेतली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करणार असल्याचे सांगत सैन्याला पूर्ण अधिकार बहाल केले होते. त्याचीच परिणीती आज भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवादाचा बिमोड करायला सुरूवात केली आहे.