

Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरूच असून, त्याबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल, असे भारतीय हवाई दलाने (IAF) आज (दि. ११ मे) स्पष्ट केले.
“ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्यामुळे, यासंबंधीची सविस्तर माहिती योग्य वेळी दिली जाईल. कृपया कुठलीही तर्कवितर्के करू नयेत आणि अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये,” असे हवाई दलाने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर म्हटले आहे.
“भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये दिलेली जबाबदारी अत्यंत अचूकतेने आणि व्यावसायिकतेने पूर्ण केली आहे. हे ऑपरेशन राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत राहून काळजीपूर्वक आणि संयमाने राबवले गेले,” असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हवाई दलाचे विधान अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये शांतता करार घडवून आणल्याचा दावा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच आले आहे.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्धबंदी झाली. मात्र अवघ्या ३ तासांनंतर पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ले केले. आम्ही लष्कराला कठोर आणि ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. दरम्यान, २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. तेव्हापासून १० मेपर्यंत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ५ जवान शहीद झाले आहेत. तर ६० जवान जखमी झाले आहेत. २५ नागरिकांचाही पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू झाला असून, ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आणखी एक उच्चस्तरीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, एनएसए अजित डोभाल तसेच आयबी आणि रॉचे प्रमुख उपस्थित होते.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर अत्यंत अचूक हल्ले केले. फक्त २६ मिनिटांत सुमारे १०० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नसली तरी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय नेत्यांना माहिती देताना १०० चा आकडा नमूद केला होता. टार्गेट्सची निवड विश्वसनीय गुप्तचर माहिती आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांवरून करण्यात आली होती.