TMC MP Mahua Moitra : कृष्णनगरच्या तृणमूल काँग्रेस (ममता बॅनर्जी गट) खासदार महुआ मोईत्रा यांना आज (दि. १६) नदिया जिल्ह्यातील तेहट्टा भागात पुन्हा एकदा विरोधाचा सामना करावा लागला. काही लोकांनी निदर्शने करत त्यांना घेराव घातला. त्यांच्यावर अंडी फेकली. महुआ यांनी फेसबुक लाईव्हद्वारे या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. . स्वातंत्र्यसैनिकांनी ज्याप्रमाणे गोळ्यांचा सामना केला होता, त्याप्रमाणेच आपणही या घटनेचा सामना केला, असे सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या एका टिप्पणीवर उपरोधिक भाष्य केले.
महुआ मोईत्रा यांनी आरोप केला की, स्थानिक भाजप नेत्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत हे कृत्य घडवून आणले, तरीही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, या मुद्द्यावरून महुआ यांनी यापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तृणमूल खासदाराला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश दिले होते आणि त्या मतदारसंघात दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी असावेत, असा आदेश दिला होता.
महुआ यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या की, "पश्चिम बंगाल पोलिसांना पूर्वकल्पना देऊन मी माझ्या मतदारसंघात एका बैठकीसाठी आले होते. खुद्द पोलिसांच्या मदतीने भाजप कार्यकर्त्यांनी माझ्यावर अंडी फेकली." त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना म्हटले होते, "कृपया जा आणि त्या अंड्यांचा सामना करा." "त्यामुळे मी माझ्या मतदारसंघात आले. पण सात ते दहा लोक तिथे आले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला."महुआ यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार चार पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत होते. पोलिसांच्या उपस्थितीतही ही घटना सुरूच राहिली; त्यानंतर अतिरिक्त पोलीस दल आले आणि त्यांनी घाईघाईने त्यांना बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला."मी पोलिसांना विचारले, 'मी काहीही चुकीचे केलेले नसताना मी गाडीत का बसावे?' पण पोलिसांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांनी अंडी आणली आणि माझ्यावर फेकली."
पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात एका आक्षेपार्ह विधानाबाबत महुआ मोईत्रा यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता. कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांना अटकेपासून दिलासा दिला असला, तरी त्यांना तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.या आदेशाविरुद्ध महुआ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कायदा-सुव्यवस्थेची चिंता आणि हल्ल्याची भीती असल्याचे कारण देत, पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी त्यांनी मागितली होती.न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने हजर राहण्याची विनंती फेटाळून लावत टिप्पणी केली की होती की, "महुआ खासदार आहेत. राजकारणात आल्यानंतर त्यांना अंड्यांची भीती वाटू लागली, तर भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:वर गोळ्या झेलल्या होत्या."