

LPG Crisis India: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून त्याचा फटका तेल आणि गॅस पुरवठ्यावर होत आहे. अशातच जगातील सर्वात मोठी तेल कंपनी सौदी अरामकोने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतासह अनेक देशांची चिंता वाढली आहे.
कंपनीने मे महिन्यापर्यंत एलपीजी म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसच्या शिपमेंट्स पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या पुरवठा साखळीवर आणखी दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी हा अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग जवळपास बंदच झाला आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि गॅस वाहतूक याच मार्गातून होते. त्यामुळे या मार्गावर निर्माण झालेल्या अडथळ्याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर झाला आहे.
पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये चर्चेचे प्रयत्न झाले, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी मध्यपूर्वेतून होणारा तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे.
भारतामध्ये घरगुती वापरासाठी एलपीजी हा अत्यंत महत्त्वाचा इंधन स्रोत आहे. सध्या अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही भागांमध्ये लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे.
सरकारकडून देशात पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सौदी अरामकोच्या जुआयमा एलपीजी केंद्राचं फेब्रुवारीच्या अखेरीस मोठं नुकसान झालं होतं. सपोर्ट स्ट्रक्चर कोसळल्याने या केंद्राला मोठा फटका बसला. त्यानंतर येथून होणारा एलपीजी निर्यात पुरवठा थांबवण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, या केंद्रातील दुरुस्ती आणि देखभालीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मे महिन्यापर्यंत शिपमेंट्स सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे.
जुआयमा सुविधा केंद्रातून जागतिक एलपीजी निर्यातीपैकी सुमारे 3.5 टक्के पुरवठा केला जातो. त्यामुळे या केंद्रातील अडचणीचा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. विशेषतः प्रोपेन आणि ब्यूटेनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने एलपीजीचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अनेक देश आता पर्यायी पुरवठादार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
भारतात एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकासाठी केला जातो. त्यामुळे पुरवठा कमी झाला किंवा दर वाढले तर त्याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांच्या खर्चावर होऊ शकतो.
जागतिक तणाव, बंद पडलेला समुद्री मार्ग आणि अरामकोचा निर्णय या सगळ्या घडामोडींमुळे पुढील काही आठवडे भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकतात. त्यामुळे आता सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.