

LPG Shortage India: मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम आता भारतातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. या युद्धाला 20 दिवस पूर्ण झाले असताना हॉर्मुज सामुद्रधुनीतून कच्चे तेल आणि गॅस घेऊन जाणाऱ्या जहाजांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, देशात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे सरकारने मान्य केले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट सांगितलं की, एलपीजीची परिस्थिती अजूनही गंभीर आहे आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, वाढत्या तणावामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती ग्राहकांना सध्या 100 टक्के एलपीजी पुरवठा केला जात आहे. पॅनिक बुकिंगमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच गॅस बुक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सरकारने एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. एलपीजीचा तुटवडा वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी इंधन पर्यायांचा विचार करावा. घाईघाईने गॅस साठवण्यापेक्षा संयम बाळगणे अधिक आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काळाबाजार आणि साठेबाजीवरही सरकारने कडक कारवाई केली आहे. देशभरात 4500 हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून, एलपीजीचा पुरवठा योग्य प्रकारे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
सरकारने देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावरही भर दिला आहे. सध्या एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन सुमारे 40 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, खाडी भागातील परिस्थितीही तणावपूर्ण आहे. राकेश सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडी भागात असलेली भारताची 22 जहाजे आणि त्यावरील खलाशी सुरक्षित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी ओमान, कतार यांसारख्या देशांबरोबर तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह जागतिक नेत्यांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
मात्र, या संघर्षामुळे जीवितहानी होत आहे. रियाधमध्ये 18 मार्च रोजी झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत या संघर्षात 6 भारतीयांचा बळी गेला आहे, अशी माहिती अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी दिली.
एकूणच, एलपीजी तुटवड्याची भीती, वाढती जागतिक अस्थिरता आणि जीवितहानी या सगळ्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. पुढील काही दिवस भारतासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.