पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले महापुराचे पाणी हळूहळू ओसरत असताना आज पुन्हा धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा अद्याप धोका पातळीवर असून आज सकाळी राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पाणीपतळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. आज (दि. ३१) सकाळी सात वाजता पाणी पातळी ४३.४ फुटांवर आहे. अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रामध्ये ११५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. काल दिवसभरामध्ये धरणक्षेत्रामध्ये १७२ मि.मी.पाऊस झाला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यभरातील सुमारे १ लाख ३८ हजार २६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला बसला असून, कोल्हापुरातील करवीर, कागल, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, आजरा आदी तालुक्यांतील एकूण २६ हजार ५८२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.