नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : एनडीए सरकारमध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पाच कॅबिनेट मंत्री आहेत. या मित्र पक्षांना अवजड उद्योग आणि पोलाद, पंचायती राज, नागरी उड्डयण यांसारखी महत्त्वाची खाती दिली आहेत. ही महत्त्वाची खाती देऊन मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि मित्र पक्षांमध्येही समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र, घटक पक्षांनी महत्वाच्या खात्यांबाबत सुरुवातीला दबाव वाढविल्यानंतरही भाजपने कुठलीही तडजोड केली नसल्याचे या खातेवाटपातून दिसून आले आहे.
मित्रपक्ष असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुमारस्वामी यांना अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय देण्यात आले तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जितन राम मांझी यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. संयुक्त जनता दलाचे ललन सिंह यांना पंचायती राज, मत्स्यव्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय व पशुपालन मंत्रालय देण्यात आले. तेलगू देसम पक्षाचे आर. पी. नायडू यांना नागरी उड्डयण मंत्रालय देण्यात आले आणि लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय देण्यात आले.
राज्य मंत्र्यांमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष, कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य मंत्रालय देण्यात आले. राज्य मंत्र्यांमध्ये रिपाई(आ)चे रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय देण्यात आले. संयुक्त जनता दलाचे रामनाथ ठाकूर यांना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांना आरोग्य, कुटुंब कल्याण, रसायन आणि खते ही मंत्रालय देण्यात आली. तेलगु देसम पक्षाचे चंद्रशेखर पेम्मासानी यांना ग्रामविकास आणि संचार मंत्रालय दिले आहे.
हेही वाचा :