

Junaid Jantar Mantar Case: दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलकांना मोफत जेवण वाटणारा जुनैद पुन्हा चर्चेत आला आहे. या अन्नवाटपासाठी निधी कुठून आला, याचा तपास करण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी जुनैदच्या उत्तर प्रदेशातील नाहल गावातील घरी जाऊन चौकशी केली. दरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांवर त्रास दिल्याचा आरोप केला असून, पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
जुनैदचे चुलत आजोबा आफताब अली यांनी सांगितले की, पोलिस दोन वेळा त्यांच्या घरी आले. पहिल्या दिवशी रात्री जुनैदचे वडील मुस्तफा यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. गावकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी बँक पासबुक आणि काही ओळखपत्रांची तपासणी करून त्यांची माहिती घेतली. याशिवाय मेरठ येथे राहणाऱ्या जुनैदच्या बहिणीच्या सासरच्या मंडळींकडेही पोलिसांनी चौकशी केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अन्नवाटप करण्यासाठी निधी कुठून आला, याची माहिती पोलीस घेत आहेत. यावर आफताब अली यांनी सांगितले की, जुनैदने स्वतःच्या खिशातून सुमारे 4 ते 5 हजार रुपये खर्च केले होते. उर्वरित मदत त्याच्या मित्रांनी आणि इतर समर्थकांनी केली. अनेकांनी रोख रक्कम देण्याऐवजी थेट अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले, असा दावा त्यांनी केला.
गाझियाबाद पोलिसांनी जुनैदच्या वडिलांना अटक केल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. ग्रामीण विभागाचे डीसीपी सुरेंद्रनाथ तिवारी यांनी सांगितले की, मुस्तफा यांना केवळ नियमित चौकशीसाठी मसुरी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
दरम्यान, जुनैदने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत गंभीर आरोप केले आहेत. याचिकेनुसार, 24 जुलैच्या मध्यरात्री दिल्ली पोलिसांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता त्यांना 5 ते 6 तास वाहनात बसवून ठेवले आणि नंतर एका ठिकाणी सोडून दिले.
तसेच, कुटुंबीयांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन धमकावल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि पोलिसांचा त्रास थांबवण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जुनैदने केली आहे.