

Pahalgam Terror Attack updates
दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताची तिन्ही सैन्य दले पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सज्ज झाली आहेत. भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी युद्ध सरावाद्वारे आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली आहे. नौदलानंतर भारतीय लष्कराने देखील युद्ध सराव सुरू केला आहे. तत्पूर्वी अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.
भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती क्रॉप्सने एक्स (X) अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारतीय लष्कर सशस्त्र पोलिस दलांसोबत संयुक्त युद्ध अभ्यास सराव करत आहे. संयुक्त ऑपरेशन्ससाठी आम्ही कौशल्ये वाढवत असून, आम्ही सर्व ऑपरेशनल परिस्थितींसाठी सज्ज आहोत, असे म्हणात फोटो शेअर केले आहेत". यावरून पाकिस्तानला धडकी भरणारी पावले भारताच्या तिन्ही दलाकडून उचलली जात आहेत.
यापूर्वी भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी आणि युद्धसज्जतेची चाचणी घेण्यासाठी विविध जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे परिक्षण केले. प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि कर्मचाऱ्यांची तयारीची पडताळणी केली. भारतीय नौदल देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि कधीही, कुठेही, कसेही, युद्धासाठी सज्ज आहे, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
त्यापूर्वी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत तैनात केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा एक धोरणात्मक संकेत मानला जात आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही तैनाती करण्यात आली आहे. 'एक्स' वर पोस्ट केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये 'विक्रांत' अरबी समुद्रात जाताना दिसत आहे.