

Japan Indian Mango Ban: जपानने भारतातून आयात होणाऱ्या आंब्यांवर बंदी घातली आहे. जपानच्या क्वारंटाईन अधिकाऱ्यांना भारतीय ट्रिटमेंट फॅसिलीटीमध्ये किटक नाशके प्रक्रियेत अनेक तृटी आढळून आल्या. या तृटी या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या तपासणीत आढळून आल्या होत्या. जपानच्या या निर्णयामुळं ऐन सिजनमध्ये आंबा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. याचा फटका हापूस, केसर, लानगरा आणि बनगनपल्ली या जातीच्या आंब्यांना फटका बसणार आहे.
जवळपास दोन दशकानंतर जपानने भारतीय आंब्यांवर बंदी घातली आहे. यापूर्वी भारतीय आंब्यांवर जपानने २००६ मध्ये बंदी घातली होती. या बंदीनंतर भारताने प्रक्रिया प्रोटोकॉल कडक केले होते. आता जपानी प्रशासनाने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. भारतातून येणाऱ्या आंब्याच्या शिपमेंट देशातील कडक प्लांट हेल्थ निकष पूर्ण करत नाहीयेत असा दावा जपानने केला आहे. जपानमध्ये फळांवरील औषध फवारणीबाबत झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे.
प्रत्येक आंबा निर्यात हंगामात जपान भारतातील वापूर हीट ट्रिटमेंट फॅसिलिटीमध्ये आपले क्वारंटाईन अधिकारी पाठवत असतात. या केंद्रात आंबा निर्यातीपूर्वी त्याचे डिसइन्फेक्टिंग केलं जातं. VHT ही एक नॉन केमिकल प्रक्रिया आहे ज्यात निर्यात करण्यात येणारा आंबा हा उष्ण आणि दमट वातावरणात ठेवला जातो. जेणेकरून फळावरील किटक आणि अळ्या मरून जातील. ही प्रक्रिया दोन देशांच्या निर्यात करारानुसार बंधनकारक आहे.
या वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशमधील रेहमानपूर भागातील VHT सेंटरमध्ये ही तपासणी झाली होती. याच्या अहवालानुसार जपानी अधिकाऱ्यांना फमिगेशन आणि डिसइन्फेक्शन प्रक्रियेत तृटी आढळून आल्या होत्या. भारत किंवा जपानच्या अधिकाऱ्यांनी जाहिररित्या नेमका तांत्रिक मुद्दा काय होता हे उघड केलेलं नाही.
जपानच्या योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने या भेटीनंतर भारतीय आंब्याच्या २५ मार्च २०२६ नंतरच्या तपासणी सर्टिफिकेट असलेल्या शिपमेंट स्विकारल्या जाणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे.
भारतीय आंब्यासाठी जपान ही काही मोठी बाजारपेठ नाहीये. मात्र निर्यातदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय आंबा हा उच्च किंमतीला विकला जातो त्यामुळं याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत प्रत्येक वर्षी २८ मिलियन मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन करतो. जगातील सर्वात जास्त आंबा उत्पादन हे भारतात होते.
भारतात उत्पादित झालेला आंबा हा जास्तीकरून देशांतर्गत मार्केटमध्येच विकला जातो. मात्र जपान सारख्या चांगली किंमत देणाऱ्या मार्केटमध्ये देखील भारतातून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात केली जाते. या निर्यातीमुळे मोठा नफा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. आता बंदीच्या भीतीमुळं भारतीय कृषी उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली जाऊ शकते. त्यामुळं इतर आयातदार देश देखील याबाबत साशंक राहण्याची शक्यता आहे.