

US Israel Iran war
नवी दिल्ली : "इराण हे युद्ध हारणार नाही, असा दावा करत इराण नेहमीच भारताच्या पाठीशी राहिला आहे, त्यामुळे आपणही इराणच्याच सोबत राहिले पाहिजे," असे मत भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ' (R&AW) चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करताना ए. एस. दुलत यांनी एक महत्त्वाचे विधान केले, ते म्हणाले की, "आपण नेहमीच इराणच्या सोबत राहिलो आहोत आणि इराणनेही नेहमीच आपल्याला साथ दिली आहे. आपण इराणच्याच बाजूने उभे राहिले पाहिजे. हे युद्ध इराण हरणार नाही आणि यामध्ये भारताची भूमिका योग्य असेल."
२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इराणच्या दाव्यानुसार, इस्रायल-अमेरिका हल्ल्यात १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यात ९०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.इराणी हल्ल्यात दोन डझनहून अधिक इस्रायली, अमेरिकन आणि अरब देशांचे नागरिक मारले गेले आहेत. दुर्दैवाने, या हल्ल्यात आखाती देशांत राहणाऱ्या दोन भारतीयांचाही मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील या युद्धामुळे पश्चिम आशियात भारताचा ध्वज असलेली २२ जहाजे अडकून पडली आहेत. या जहाजांवर १६.७ लाख टन कच्चे तेल, ३.२ लाख टन एलपीजी (LPG) आणि सुमारे दोन लाख टन एलएनजी (LNG) साठा आहे.शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे की, "ही जहाजे 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पार करून पुढे जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.युद्ध सुरू झाले तेव्हा भारतीय ध्वज असलेली २८ जहाजे तिथे होती.यापैकी २४ जहाजे हॉर्मुझच्या पश्चिम किनाऱ्यावर, तर ४ जहाजे पूर्व किनाऱ्यावर होती.गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन-दोन जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाली आहे. सध्या पश्चिम किनाऱ्यावर २२ भारतीय जहाजे अडकलेली असून, त्यावरील सर्व ६११ खलाशी सुरक्षित आहेत."