

Himachal Flood Death Toll
मंडी : हिमाचल प्रदेशात यंदाच्या मान्सूनने भीषण स्वरूप धारण केले असून, गेल्या महिनाभरात विविध नैसर्गिक आपत्तींत 116 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 20 जून ते 18 जुलै या कालावधीत पावसाशी संबंधित आपत्ती आणि अपघातांमध्ये ही मृत्युसंख्या नोंदवण्यात आली आहे.
या एकूण मृतांपैकी 68 जणांचा मृत्यू थेट पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे. त्यामध्ये 33 वेगवान पूर (फ्लॅश फ्लड्स), 22 ढगफुटी (क्लाउडबर्स्ट), आणि 19 दरड कोसळणे (लँडस्लाइड्स) यांचा समावेश आहे.
फ्लॅश फ्लड्स आणि ढगफुटीमध्ये प्रत्येकी 14 जणांचा मृत्यू, बुडाल्यामुळे 12 जणांचे प्राण गेले, विजेचा धक्का बसून 5 जणांचा मृत्यू झाला, तर दरड कोसळल्यामुळे 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय साप चावणे, दगड कोसळणे यांसारख्या अन्य कारणांनी 22 मृत्यू झाले आहेत.
पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, घसरट चढ-उतार, दरड कोसळणे आणि कमी दृश्यता यामुळे राज्यात 48 रस्ते अपघातांचे बळी गेले आहेत.
सोलानमध्ये 8, कुल्लूमध्ये 7, चंबामध्ये 6 आणि शिमलामध्ये 4 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
हिमाचलमधील मंडी, कांगडा, कुल्लू आणि लाहौल-स्पीती हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. मंडी आणि कांगडा येथे प्रत्येकी 16 जणांचा मृत्यू, तर कुल्लूमध्ये 7 जणांचे प्राण गेले आहेत.
मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूराच्या आपत्तीमुळे राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा, घरे, शेती, पशुधन आणि दळणवळण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान 1230 कोटी रुपये इतके असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
सध्या NDRF, SDRF, होम गार्ड्स आणि स्थानिक प्रशासनामार्फत बचाव आणि पुनर्स्थापना कार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यावश्यक नसल्यास डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच स्थानिक हवामान आणि आपत्ती विषयक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचे सांगितले आहे.