पुढारी ऑनलाईन डेस्क : Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगात मंगळवारी (दि. 2) चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत 200 हून अधिक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: राज्यातील या मोठ्या घटनेची दखल घेतली आहे. दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे आणि घटनास्थळी मदतकार्याला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आग्र्याचे एडीजी आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली घटनेच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीएम योगींच्या सूचनेनंतर सरकारचे दोन वरिष्ठ मंत्री आणि डीजीपीसह मुख्य सचिवही घटनास्थळी रवाना झाले.
उत्तर प्रदेशातील सिकंदरराव येथील फुलराई गावात मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर सर्व जखमींना प्रथम एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. येथे एकामागून एक 27 लोकांचा मृत्यू झाला. हा मृतदेहांचा खच पाहून ड्युटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला हृदयविकाराचा झटका आला आणि हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. ते मूळचे अलिगढ जिल्ह्यातील बन्ना देवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगरचे रहिवासी होते. सध्या ते केवायआरटी अवगढ येथे नियुक्ती करण्यात आली होती. पण मंगळवारची दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने या पोलिस कॉन्स्टेबलला वैद्यकीय महाविद्यालयात आपत्कालीन ड्युटीवर नियुक्त केले. पण दुर्घटनेतील मृतदेहांचा खच पाहणे पोलिस कॉन्स्टेबलचा थरकाप उडाला. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.