

Delhi AI Summit protest case
नवी दिल्ली : येथे झालेल्या 'एआय समिट' (AI Summit) दरम्यान काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कपडे काढून (शर्टलेस) आंदोलन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांना आज (दि. २१) न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयात दावा केला की, "हे आंदोलन नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनासारखेच होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी हे एक मोठे षड्यंत्र होते." या आंदोलनामागे नेमका कोणाचा हात आहे आणि याचा हेतू काय होता, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणीही पोलिसांनी केली.
दिल्लीत झालेल्या 'एआय समिट' (AI Summit) दरम्यान शुक्रवारी (दि. २०) काही तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी कपडे काढून (शर्टलेस) आंदोलन केले होते. सरकारविरोधी घोषणा असलेले टी-शर्ट त्यांनी घातले होते. प्रदर्शन हॉलमध्ये सरकार आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणी भारतीय युवा काँग्रेसचे कार्यकर्ते कृष्णा हरी, कुंदन यादव, अजय कुमार आणि नरसिंह यादव यांना अटक करण्यात आली.
आरोपींच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी भारत मंडपम येथे फक्त त्यांच्या लोकशाही हक्काचा वापर करून शांततेत आंदोलन केले होते. कोणत्याही व्हिडिओमध्ये हे लोक हिंसा करताना दिसलेले नाहीत; त्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततेत होते. त्यांच्यावर जे आरोप ठेवले आहेत, त्या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंतच शिक्षा होऊ शकते. त्यांच्याविरोधात करण्यात आलेली कारवाई ही केवळ राजकीय हेतूने आणि सूडबुद्धीने केली आहे. अटक केलेले तरुण सुशिक्षित असून त्यांच्याकडे पदव्या आहेत, त्यामुळे ते गुन्हेगार नाहीत. कोठडीसाठी ठोस कारण असले पाहिजे. ते तरुण आहेत, त्यांचे करिअर आहे आणि राजकीय मतभेद अशा प्रकारे चिरडले जाऊ नयेत. "हा शांततापूर्ण निषेध होता," असा वकिलांनी युक्तिवाद केला.
आरोपींनी आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत देशविरोधी घोषणा दिल्या आणि पंतप्रधानांविरुद्ध मजकूर असलेले टी-शर्ट घातले होते. हे चारही जण वेगवेगळ्या ठिकाणांहून एकत्र आले आणि त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने टी-शर्ट छापून घेतले. यामागे मोठा कट असण्याची शक्यता आहे. आंदोलनात सहभागी असलेले इतर काही लोक पळून गेले आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी या चौघांची चौकशी करणे गरजेचे आहे. या घटनेत ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच, या आंदोलनासाठी कोणी पैसे (Funding) पुरवले आहेत का, हे तपासण्यासाठी आरोपींचे मोबाईल जप्त करून त्यांची तपासणी करायची आहे, असा युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी आरोपींना ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.